रायगड दुर्घटना; आतापर्यंत ४४ मृतदेह काढले बाहेर


रायगड – कोकणात मागील दोन दिवसांपासून आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोसळला असून मुसळधार पाऊस कोसळत असतानाच दरडीआड दबा धरून बसलेल्या काळाने डाव साधला आणि काही क्षणांत अनेकांचे संसार चिखलात रुतून गेले. हजारो माणसांना जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. दरडी कोसळल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. पण, ढिगाऱ्याखालून जी माणसे बाहेर काढली जात आहे, त्यांच्यात प्राणच राहिलेले नाहीत. ४४ जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले असून, तब्बल ५० पेक्षा अधिक माणसे अजूनही ढिगाऱ्याखालीच असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

राज्याच्या काही भागांत रविवावारपासून मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे. कोकणावर तर पुराचे संकटच ओढवले. संततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. गुरुवारी झालेली ही घटना शुक्रवारी समोर आली. प्रचंड पाऊस आणि विविध भागांचा तुटलेला संपर्क यामुळे वेळेत मदत पोहचू शकली नाही. त्यामुळे प्रचंड जीवितहानी झाली. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांना आता बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. पण, ज्यांना बाहेर काढले जात आहे, त्यांच्यात प्राणच राहिलेले नाहीत.

रायगड जिल्ह्यातील इतर ठिकाणीही दरड कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या. दरड कोसळलेल्या ठिकाणी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफबरोबरच लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले असून, शनिवारी सकाळपर्यंत ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांचे ४४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हे मृतदेह दोन ठिकाणाहून काढण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. त्याचबरोबर ३५ जखमी झालेले असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

अद्याप एका ठिकाणी बचाव कार्य सुरूच आहे. प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी असून, ५० पेक्षा अधिक लोकांचे मृतदेह ढिगाऱ्याखाली दबलेले असण्याची भीती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाकडून बचावकार्याला वेग देण्यात आला आहे. अतिवृष्टी झाल्याने गुरुवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास वरंध घाट परिसरातील तळये गावातील कोंडाळकर वाडीवर दरड कोसळली. ३५ पैकी ३२ घरे दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. तर दुसरीकडे पूरपरिस्थिती आणि संपर्क यंत्रणाच कोलमडल्यामुळे दुर्घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचू शकली नाही. शुक्रवारी सकाळी पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर मदतकार्य सुरू झाले, पण तोपर्यंत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली.