काल दिवसभरात देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर 546 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – सलग दुसऱ्या दिवशी देशात 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शनिवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 39,097 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 546 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे.

कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या देशात चार लाखांहून अधिक झाली आहे. एकूण 4 लाख 8 हजार रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 13 लाख 32 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 20 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत 3 कोटी 5 लाख 3 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 23 जुलैपर्यंत 42 कोटी 78 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 42 लाख 67 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 45 कोटी 45 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 16.31 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. ज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून कमी आहे.

देशात कोरोनाचा मृत्यूदर 1.34 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. तर सक्रिय रुग्णसंख्या 1.30 टक्के आहे. कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत जगभरात भारत सातव्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 6,753 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 979 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 22 हजार 485 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे.

काल राज्यात 167 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 28 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 94 हजार 769 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (20), हिंगोली (52), यवतमाळ (14), गोंदिया (58), गडचिरोली (91) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 809 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल परभणी जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 817 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4, 64,46, 360 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,51, 810 (13.46 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,52,702 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,653व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 374 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 582 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,09,198 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,779 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1209 दिवसांवर गेला आहे.