रायगड – रायगड जिल्ह्याची मुसळधार पावसामुळे दाणादाण उडवली आहे. संततधार पावसामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान तर झालेच आहे, पण प्रचंड जीवितहानीही झाली आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात झालेल्या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. या दुर्घटनेनंतर सुरू झालेल्या आक्रोशाचा टाहो शांत होण्याआधीच आणखी एक दरड कोसळल्याची दुर्घटना रायगड जिल्ह्यात घडली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत दरड कोसळली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत कोसळली दरड
तळीये गावात दरड कोसळल्यामुळे हाहाकार उडाला आहे. तळीयेमध्ये मदत व बचावकार्य सुरू असतानाच महाड तालुक्यात आणखी एक दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीत मोठी दरड कोसळली आहे. महाडपासून २५ ते ३० किमी अंतरावर हिरकणीवाडी असून, रायगड किल्ल्याच्या पायथ्यालाच आहे. आजूबाजूला डोंगर भाग असून, दरड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, तळीयेतील दरड दुरर्घटनेनंतर ही घटना घडल्यामुळे हिरकणीवाडीत भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर नागरिकांना जवळच्या पाचाड गावात हलवले जात आहे.
अतिवृष्टीने राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना तडाखा दिला. पाऊस एवढा भयंकर होता की, असंख्य गावे पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी नद्यांचे पाणी गावांमध्ये शिरल्यामुळे तीन दिवस झाले तरी परिस्थिती अद्याप जैसे थे असल्याचे चित्र आहे. दरम्यान, एनडीआरएफसह लष्कर, नौदल, हवाई दलाला मदत व बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आज तळीये गावाला भेट देऊन आढावा घेतला.