शेतकऱ्यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी मागितली माफी


नवी दिल्ली – शेतकऱ्यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी माफी मागितली आहे. आंदोलक शेतकरी मवाली असल्याचे वक्तव्य नवनियुक्त मंत्री मीनाक्षी लेखी यांनी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. शेतकऱ्यांचे आंदोलन गुन्हेगारी स्वरूपाचे असून २६ जानेवारी रोजी झालेला हिंसाचार लज्जास्पद आहे. विरोधी पक्ष या आंदोलनाला फूस देत असल्याचीही टीका लेखी यांनी केली होती.

मीनाक्षी लेखी यांनी माफी मागताना शेतकरी संसद दरम्यान प्रसारमाध्यमांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आपण केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटले आहे. दिल्लीमधील जंतर मंतरमध्ये कृषी कायद्यांविरोधात आयोजित आंदोलनादरम्यान एका वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर हल्ला करण्यात आला होता.

२६ जानेवारीला पत्रकार परिषदेदरम्यान लाल किल्ला येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तसेच शेतकरी संसदरम्यान पत्रकारावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी माझे मत विचारण्यात आले होते. मी उत्तर देताना शेतकरी नाही तर फक्त मवाली अशा गोष्टी करु शकतात, असे म्हटल्याचे स्पष्टीकरण मीनाक्षी लेखी यांनी दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून यामुळे शेतकरी किंवा अन्य कोणी दुखावले असेल तर मी माफी मागते आणि माझे शब्द मागे घेते, असे मीनाक्षी लेखी यांनी एएनआयशी बोलताना सांगितले आहे.

माझ्यासोबत काही लोक असभ्य भाषेत वर्तन करत असताना काहीजण व्हिडीओ शूट करत होते. भांडण झाल्यानंतर एका व्यक्तीने लाईट स्टँडने माझ्या डोक्यावर वार केला. त्याने तीन वेळा माझ्यावर हल्ला केला. त्याच्याकडे किसान मीडिया नावाचे एक ओळखपत्र होते. तो शेतकरी होता की नाही माहिती नाही, पण त्याचा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता, हे दिसत असल्याचे हल्ला झालेल्या पत्रकाराने म्हटले आहे.

मीनाक्षी लेखी यांना याबद्दल पत्रकार परिषदेत विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, ते शेतकरी नाही, तर मवाली आहेत. या गुन्हेगारी घटना आहेत. २६ जानेवारीलाही जे काही झाले तेदेखील लाजीरवाणे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे होते. विरोधक अशा गोष्टींना फूस देत आहोत. लेखी यांच्या या वक्तव्यावर शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी गुंड वा मवाली नाहीत, ते देशाचे अन्नदाते आहेत. लेखींनी आक्षेपार्ह वक्तव्य करू नये, असे राकेश टिकैत म्हणाले.