मुंबई – मागील काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक दुर्घटना घडत असून यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या गंभीर परिस्थितीत मनसैनिकांना महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. राज ठाकरे यांनी यासाठी मनसैनिकांना पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन… pic.twitter.com/JiT5I13l4Q
— Raj Thackeray (@RajThackeray) July 23, 2021
राज ठाकरे यांनी या पत्रात लिहिले की, महाराष्ट्रात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. या अवघड परिस्थितीत मनसैनिकांनी पूरग्रस्तांना जमेल तितकी मदत करावी. आता लोकांचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. जसजसा पूर ओसरेल तसा रोगराईचा धोका वाढेल. तुम्ही त्यात लक्ष घालून योग्य ती मदत पोहचेल, असे पाहावे. महाराष्ट्रावर मोठे संकट आहे. त्याला तोंड देताना आपल्याकडून कोणतीही कुचराई होता कामा नये, तसेच काम करताना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी पत्राद्वारे मनसैनिकांना केले आहे.
दरम्यान, पावसाने रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना महाडमध्ये घडली असून यात आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचाव आणि मदतकार्य मोठ्या प्रमाणावर सुरु असून पंतप्रधानांनी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.