आयकर आणि जीएसटीच्या तपासणीत रोडच्या कडेला गाडी लावून व्यवसाय करणारे २५६ जण निघाले करोडपती


नवी दिल्ली – कानपूरमधील रस्त्याच्या कडेला पान, चाट आणि समोसा विकणारे विक्रेते कोटींमध्ये खेळत असल्याचे ऐकुण तुम्ही देखील थक्क व्हाल. पण ही गोष्ट खरी आहे. गल्ली बोळात छोटे-छोटे दुकानांचे मालक, किराणा मालाचे दुकानदार, औषध विक्रेते करोडपती आहेत. फळ विक्रेत्यांकडेही शेकडो एकर शेतजमीन आहे. आपल्याकडे फक्त एक कार असू शकते परंतु यांच्याजवळ तीन-तीन कार आहेत. पण हे सर्वजण ना आयकर भरतात ना जीएसटीच्या नावावर एक पैसा देतात. बिग डेटा सॉफ्टवेअर, आयकर विभाग आणि जीएसटी नोंदणीच्या तपासणीत रोडच्या कडेला गाडी लावून व्यवसाय करणारे २५६ जण करोडपती निघाले आहेत.

आयकर विभाग दिसायला गरीब दिसणाऱ्या या धनदांडग्यांवर गुप्त नजर ठेऊन होते. केवळ आयकर भरणा आणि परतावा भरणाऱ्या करदात्यांची देखरेख करण्याशिवाय, विभाग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पैसे कमवणाऱ्या अशा व्यापाऱ्यांचा डेटाही सतत गोळा करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने गुप्त करोडपतींना पकडण्यास त्यांनी सुरवात केली आहे.

एक पैसाही जीएसटी नोंदणी बाहेरील या व्यापाऱ्यांनी कर भरला नाही. पण ३७५ कोटींची मालमत्ता चार वर्षात विकत घेतली. ही मालमत्ता आर्यनगर, स्वरूप नगर, बिरहाना रोड, हुलागंज, पिरोद, गुमटी यासारख्या अत्यंत महागड्या व्यावसायिक भागात खरेदी केल्या गेली. तसेच दक्षिण कानपूरमध्ये निवासी जमीन खरेदी केली. तसेच ३० कोटींपेक्षा जास्त किंमतीची केव्हीपी खरेदी केली. ते ६५० एकर शेतजमिनीचे मालक देखील बनले. कानपूर देहात, कानपूर नगर, बिठूर, नरमाऊ, मंधाना, बिल्हौर, काकवण, सरसौल ते फारुखाबाद या ग्रामीण भागात त्यांनी जमिनी खरेदी केल्या आहेत.

कोरोना काळात आर्यनगरमधील दोन, स्वरूप नगरमधील एक आणि बिरणा रोडमधील दोन पान दुकानांच्या मालकांनी पाच कोटींची मालमत्ता खरेदी केली आहे. मालरोड रोडवर खस्ता विकणारा वेगवेगळ्या गाड्यांवर दरमहा १.२५ लाख रुपये भाडे देत आहे. स्वरूप नगर, हुलागंज येथील दोन रहिवाशांनी दोन इमारती खरेदी केल्या. लालबंगला येथील एक आणि बेकणगंज येथील दोघांनी दोन वर्षात तीन मालमत्ता खरेदी केल्या आहेत, ज्यांचे बाजार मूल्य १० कोटींपेक्षा जास्त आहे. बिरहाना रोड, मॉल रोड, पी रोडच्या चाट व्यापाऱ्यांनी जमिनीवर बरीच गुंतवणूक केली. जीएसटी नोंदणीबाहेरील किरकोळ व्यापारी आणि औषध विक्रेत्यांची संख्या ६५ पेक्षा जास्त आहे ज्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

प्राप्तिकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्ती उत्पन्न बऱ्याच प्रमाणात वाढते, तेव्हा तो व्यक्ती गुंतवणूकीचा मार्ग शोधत असतो. फेरीवाले, पान ठेल्यावाल्यांची जीवनशैली अतिशय साधी असते, त्यामुळे त्यांचा खर्च मर्यादित असतो आणि बचत जास्त असते. कोणत्याही विभागाच्या नजरेत हा पैसा येऊ नये म्हणून त्यांनी चलाकी दाखविली. विभागाच्या नजरेतून वाचण्यासाठी त्यांनी सहकारी बँकेत खाते उघडले. या मालमत्तेत बहुतांश गुंतवणूक भाऊ, मेव्हणी, काका, मामा आणि बहीण यांच्या नावावर केली गेली आहे. परंतु पॅनकार्ड स्वत:चे जोडले. केवळ एकाच मालमत्तेत पॅनकार्ड आणि आधार मिळताच त्यांचा भांडाफोड झाला आहे.