‘द कपिल शर्मा शो’मध्ये कमी मानधनात काम करणार भारती सिंह


कोरोना काळात ब्रेक घेतलेला टीव्हीवरचा सर्वात लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा लोकांना हसवण्यासाठी परत येत आहे. पुन्हा पहिल्यासारखे काम या शोमध्ये करता येणार असल्यामुळे या शोमधील कॉमेडियन भारती सिंह सध्या खूपच आनंदात आहे. पण त्यातच तिला एका गोष्टीचे दुःख देखील वाटत आहे. चित्रपटसृष्टीवर कोरोनाचा जसा परिणाम झाला तसाच परिणाम टीव्ही इंडस्ट्रीवर सुद्धा झाला आहे. अनेक कलाकारांच्या हाताला याच कारणामुळे काम नाही आणि ज्यांना काम मिळाले आहे, त्यांना कमी मानधनावर काम करावे लागत आहे. असेच काहीसे कॉमेडियन भारती सिंहच्या बाबतीत झाले आहे. याबाबतचा आपला हा दुखवटा नुकताच तिने व्यक्त केला आहे.

भारती सिंहने तिचा हा दुखवटा एका माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे. सुरवातीला भारती सिंह ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये बुआची भूमिका साकारत होती. सध्या ती ‘डान्स दिवाने 3’ हा शो होस्ट करत आहे. या शो मध्ये होस्ट करण्यासाठीचे तिचे मानधन ७० टक्के कमी करण्यात आले आहे. तर आता लवकरच सुरू होणाऱ्या तिच्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये त्याहूनही कमी म्हणजेच ५० टक्के मानधन कमी करण्यात आले आहे.

भारती सिंह यावेळी माध्यमासोबत बोलताना म्हणाली, या काळात सर्वांनाच दुःख झाले होते, जेव्हा त्यांना पेट कट बद्दल सांगण्यात आले. माझे सुद्धा काही वेगळे नाही. मी सुद्धा या विषयावर अनेकदा चर्चा केली. पण त्यानंतर मला जाणीव झाली की, गेल्या एक वर्षात कित्येकांचे काम बंद झाले आहेत. टीव्ही शोसाठी स्पॉन्सर्स मिळत नाहीत, अशा परिस्थितीत चॅनल पैसे कुठून आणणार? प्रत्येक जण आता स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. एकदा आम्हाला चांगले रेटींग मिळायला सुरूवात झाली की स्पॉन्सर्स सुद्धा आपोआप येतील आणि आमचे मानधन देखील वाढेल.

भारती सिंह यापुढे बोलताना म्हणाली, एवढ्या वर्षापासून आम्ही चॅनलमध्ये काम करत आहोत आणि ते आमची प्रत्येक गोष्ट ऐकतात. आज जर ते समोरून आमची मदत मागत आहेत, तर मला नाही वाटत कोणत्या कलाकाराने यासाठी नकार दिला असेल. जेव्हा परिस्थिती सामान्य होती, तेव्हा ते आमचे सगळे ऐकत होते. प्रत्येक मागणी पूर्ण करत होते. मला माहित आहे सर्वांच्या मानधनात कपात होत आहे. पण सेटवरील टेक्निशियनचे पैसे कट केले नाही पाहिजेत. देशात काही महिन्यानंतर पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती होईल, सारे काही सुरळीत होईल आणि व्हायलाच पाहिजे.

भारती सिंह टीव्हीवरचा लोकप्रिय शो ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा कमबॅक करणार असल्यामुळे आनंदी आहे. यावर बोलताना भारती म्हणाली, आम्ही कोरोना संकटानंतर पुन्हा परत येत आहोत. अशा महामारीच्या काळात तर कॉमेडी शो आले पाहिजेत. ‘द कपिल शर्मा शो’ याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात ऑफ-एअर करण्यात आला होता. महामारीच्या काळातली शूटिंगची रिस्क आणि कपिश शर्माला ब्रेक हवा असल्यामुळे हा शो बंद करण्यात आला होता. पण आता हा शो पुन्हा एकदा परतणार असल्याने कपिलचे चाहते या शोची आतुरतेने वाटत पाहत आहेत.