देशात कोरोनाचा कहर कायम, काल दिवसभरात 41 हजार कोरोनाबाधितांची नोंद, तर 507 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – कोरोनाचा कहर अद्याप देशात कायम असून आज पुन्हा एकदा 40 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 41383 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 507 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 9 हजार लोकांना सध्या कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत तीन कोटी 12 लाख 57 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 18 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3 कोटी 4 लाख 29 हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात 21 जुलैपर्यंत 41 कोटी 78 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 22 लाख 77 हजार लसीचे डोस देण्यात आले. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 45 कोटी 9 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 17.18 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्के एवढा आहे.

1.31 टक्क्यांवर देशाचा मृत्यूदर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 1.30 टक्के आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात सातव्या स्थानी पोहोचला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

काल महाराष्ट्रात 8 हजार 159 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 7 हजार 839 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 8 हजार 750 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. राज्यात काल 165 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 94 हजार 745 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (31), हिंगोली (45), यवतमाळ (17), गोंदिया (55) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 566 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

काल धुळे, नंदूरबार या दोन जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तर कोल्हापुरात सर्वाधिक 996 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,60,68,435 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,37,755 (13.54 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,51,521 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3,795 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या 24 तासात मुंबईत 435 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,08,214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,020 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1097 दिवसांवर गेला आहे.