‘एटीएम’मधून पैसे काढणे यापुढे होणार महाग


नवी दिल्ली – एटीएममधून पैसे काढणे आणि डेबिट/क्रेडिट कार्डच्या शुल्कात आता वाढ होणार आहे. विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा पैसे ग्राहकांनी एटीएममधून काढले, तर बँका त्यांचे शुल्क वाढवू शकतात. एटीएमवरील शुल्क वाढीसाठी बँकांकडून प्रत्येक व्यवहारासाठी 21 रुपयांच्या प्रस्तावाला आरबीआयने नुकतीच मान्यता दिली आहे. 1 जानेवारी 2022 पासून हे नवीन दर लागू होतील. ग्राहक बँकेच्या एटीएमद्वारे दरमहा पाच मोफत व्यवहार करू शकतात.

आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहारांचा यात समावेश आहे. यापेक्षा जास्त व्यवहार झाले तर, ग्राहकांना शुल्क भरावे लागते. यासाठी आता प्रत्येक व्यवहारासाठी 20 रुपये अतिरिक्त रक्कम द्यावी लागेल. बँकांचे एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांकडून रोख रक्कम काढण्यासाठी मेट्रो शहरांमध्ये तीन आणि इतर शहरांमध्ये पाच विनामूल्य एटीएम व्यवहारांची सवलत आहे.

एटीएम व्यवहाराची इंटरचेंज फी प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी 15 रुपयांवरून 17 रुपयांपर्यंत आरबीआयने वाढविली आहे आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी 5 रुपयांवरून 6 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. 1 ऑगस्ट 2021 पासून हे नवीन दर लागू होतील. आरबीआयच्या मते, इंटरचेंज फी ही क्रेडिट कार्डे किंवा डेबिट कार्ड्सद्वारे पेमेंटवर प्रक्रिया करणाऱ्या मर्चंट्सकडून आकारली जाणार आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने जुलैच्या सुरूवातीस एटीएम आणि बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी सेवा शुल्कामध्ये बदल केला आहे. त्याअंतर्गत अनेक शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. एसबीआयच्या म्हणण्यानुसार बीएसबीडी खातेधारक आता कोणत्याही सेवा शुल्काशिवाय केवळ चार वेळा शाखा आणि एटीएममधून पैसे काढू शकतील. जर ग्राहक एटीएम किंवा शाखेतून यापेक्षा जास्त पैसे काढत असतील, तर प्रत्येक व्यवहारासाठी त्यांना सेवा शुल्क व जीएसटी म्हणून 15 रुपये द्यावे लागतील. एसबीआयशिवाय अन्य कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी हाच नियम लागू असेल.