मुंबईकरांनो, आगामी तीन दिवस धोक्याचे! पावसाचा जोर वाढला


मुंबई – देशभर सक्रिय झालेल्या पावसाने मुंबईत धुमाकूळ घातला असून मुंबईत गेल्या आठवड्यापासून अविरतपणे पाऊस कोसळत असून, शनिवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. धुंवाधार पावसाचा परिणाम लोकल सेवेसह रेल्वे वाहतुकीवरही होत असून, पावसाचा जोर बुधवारी पहाटेपासून पुन्हा एकदा वाढला आहे. मुंबईशहरासह उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत असून, सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पावसाचा जोर पुढील तीन दिवस कायम राहणार असून, हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मुंबईकरांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी मुंबईत मंगळवारी बरसल्या. रात्री ८.३० वाजेपर्यंत राम मंदिर येथे ७८ मिमी असा २४ तासांचा सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. कुलाबा येथे कमाल तापमान ३१ अंश तर किमान तापमान २५.५ मिमी नोंदवले गेले. तसेच सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३१.१ आणि किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईत बुधवारी पहाटेपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाची संततधार सकाळपासून कायम असून, महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

सकाळी १० वाजेनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे रस्त्यावर धुके पसरल्यासारखं वातावरण तयार झालं होतं. पावसाची संततधार कायम असल्यानं मुंबईतील सायनसह अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम प्रवासी रेल्वेवर झालेला नाही. मुंबई, ठाणे, पालघर येथे पुढील ३ दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर या जिल्ह्यांत पुढील ३ दिवस तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनापट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून तो पुढील तीन दिवस कायम राहण्याची शक्यता असल्यामुळे कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.