मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचला दोन तरुणांचा जीव


पंढरपूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या हस्ते पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा आज पहाटे पार पडली. मुख्यमंत्री या महापुजेसाठी मुसळधार पाऊस आणि खराब वातावरणामुळे स्वत: ड्राइव्हिंग करत सोमवारी रात्री पंढरपूरमध्ये दाखल झाले. पण या प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या मार्गामध्ये एका गावात दोन बाईकस्वारांचा अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली आणि या तरुणांना वाचवण्यासाठी त्यांनी तातडीची मदत पाठवल्यामुळे या तरुणांचा जीव वाचला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र आदित्य ठाकरेंसोबत सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाले. रात्री नऊच्या सुमारास जवळजवळ आठ तासाच्या ड्रायव्हिंगनंतर मुख्यमंत्री सहकुटुंब पंढरपूरमध्ये दाखल झाले. पण मुख्यमंत्र्यांचा ताफा या प्रवासादरम्यान पंढरपूरच्या पंचक्रोषीमध्ये असणाऱ्या करंबक गावाजवळ आला असता येथे दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांची एक गाडी आणि रुगणवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली.


या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मदतीमुळे आणि रुगणवाहिकेमुळे अपघातग्रस्त तरुणांना वेळीच उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले. केवळ मदत न पाठवता पंढरपूरमध्ये पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: या तरुणांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे दोन तरुणांचे प्राण वाचले. याच घटनेची सोशल नेटवर्किंगवर चर्चा असून शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही ट्विट करुन याबद्दल माहिती देत मुख्यमंत्र्यांना संवेदनशील मुख्यमंत्री असे म्हटले आहे. “आतुरता पुन्हा विठ्ठल दर्शनाची… जनतेची काळजी असणारे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. पंढरपूरला महापुजेसाठी जात असतांना करकंब गावाजवळ दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याचे कळाल्यावर स्वतःच्या ताफ्यातील रुगणवाहिका त्यांच्या मदतीसाठी देण्याचे आदेश दिले… संवेदनशील मुख्यमंत्री, असे गोऱ्हेंनी म्हटले आहे.