हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येणार भाजप-मनसे ?


मुंबई : शिवसेना आणि भाजपची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून 25 वर्षांहून अधिक काळ टिकली. पण शिवसेनेने या आपल्या जुन्या मित्राची साथ विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यामुळे आता शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप नव्या भिडूच्या शोधात असून, त्यांना आपला नवा भिडू देखील सापडला असून, हे दोन्ही पक्ष भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. भाजपचा हा नवा साथीदार दुसरा तिसरा कुणी नसून, मनसेच्या साथीने शिवसेनेला शह देण्याचा मनसुबा भाजप रचत असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळत आहे.

शिवसेना भाजप मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत वेगवेगळे लढले होते. राज्यात दोघेही सत्तेत एकत्र होते, पण दोघांनी एकमेकांना टक्कर चांगली दिली होती. त्यामुळे भाजपला जर मनसेची साथ मिळाली, तर भाजप शिवसेनेचा महापौर पद धोक्यात आणू शकते. भाजपच्या जागांमध्ये राज ठाकरेंची जादू चालली, तर मनसेही थोड्या थोडक्या जागा जिंकू शकते, त्यामुळे भाजप मनसेची युती शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे.

मनसेने मागील वर्षी आपल्या झेंड्याचा रंग बदलत आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यातच शिवसेनेच्या हिंदुत्वावर सध्या प्रश्न चिन्ह उपस्थित होत असताना येत्या निवडणुकीत मनसेसोबत प्रत्यक्ष किंव्हा अप्रत्यक्षपणे हातमिळवणी करण्याचा मानस भाजपचा असून, ठाणे, नवी मुंबई, पुणे नाशिक तसेच मुंबई, यासारख्या महत्वाच्या पालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांना मदत करतील, असे देखील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून भविष्यात मनसे आणि भाजप एकत्र येतील अशी चर्चा सुरू होती. पण उत्तर भारतीयांबाबत सुरुवातीच्या काळात राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका यामुळे उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याच्या भीतीने भाजप मनसे सोबत जाण्यास तयार नव्हते. तसेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी जर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, तर नक्की विचार होऊ शकतो असे सांगितले होते. पण आज खुद्द राज ठाकरे यांनीच चंद्रकांत पाटील यांना सांगितले की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाला. त्याची लिंकही ते त्यांना पाठवणार असल्याचे दादा म्हणाले आहेत.

जर रयत संघटना आणि इतरांना आम्ही मान देऊ शकतो, तर राज ठाकरे हे मोठे नेतृत्व आहे. राज ठाकरे यांच्याबाबत भाजप कोअर टीम निर्णय घेईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी देत भाजप-मनसे एकत्र येण्याचे संकेत दिले. तसेच राजकारण आणि समाजकारणात दोस्ती वेगळी आणि व्यवहार वेगळा असतो. व्यवहारात आमचे निर्णय राज्याची टीम घेत असते. मी राज्याचा अध्यक्ष आहे. पण आमचे निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, असेही चंद्रकांत दादा यावेळी म्हणाले.