125 दिवसांनी देशात सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, तर 374 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – आज देशात 125 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. आज 30 हजार 93 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आल्यामुळे देशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच कोरोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट 1.68 टक्के आहे. देशात काल 374 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 कोटी 11 लाख 74 हजार 322 वर पोहोचला आहे. अशातच सोमवारी 374 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एकूण 4 लाख 14 हजार 482 वर पोहोचली आहे. देशात 45 हजार 254 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 3 लाख 53 हजार 710 वर पोहोचली आहे. देशातील सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 6 हजार 130 वर पोहोचला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 52 लाख 67 हजार 309 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर एकूण लसीकरणाचा आकडा 41 कोटी 18 लाख 46 हजार 401 वर पोहोचला आहे. आयसीएमआरने ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरससाठी 17 लाख 92 हजार 336 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 44 कोटी 73 लाख 41 हजार 133 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 6 हजार 17 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर त्याच्या दुप्पट रुग्ण आज कोरोनामुक्त झाले आहेत. काल राज्यात 13 हजार 51 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 93 हजार 401 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.35 टक्के आहे. राज्यातील अॅक्टिव रुग्णसंख्या ही एक लाखाच्या खाली आली आहे. राज्यात सध्या 96 हजार 375 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यात काल 66 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 42 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. जालना (39), हिंगोली (67), यवतमाळ (25), गोंदिया (60), चंद्रपूर (49) या पाच जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15,768 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेल्या 24 तासात मुंबईत 402 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 577 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,07,129 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,349 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1034 दिवसांवर गेला आहे.

तर पुणे महापालिका क्षेत्रात आज 196 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 289 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात 2855 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल (सोमवार) एकूण सहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद पुणे महापालिका क्षेत्रात करण्यात आली आहे.