कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक असेल : आयआयटी कानपूर


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसची दुसऱ्या लाटेने महाभयंकर रुप धारण केले होते. दुसऱ्या लाटेदरम्यान उद्भवलेली परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्नशील आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान झालेल्या जखमा कधीही विसरता येणार नाहीत. त्यात आता तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आयआयटी कानपूरच्या प्राध्यापकांनी एक दिलासादायक माहिती दिली आहे. आयआयटीचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणिताच्या विश्लेषणाच्या ‘फॉर्म्युला’च्या आधारे दावा केला आहे की तिसरी लाट दुसर्‍या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असेल. ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान तिसरी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

याबाबत आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल म्हणाले की, आम्ही गेल्या एका महिन्यात तिसर्‍या लाटाचे मूल्यांकन करण्यासाठी आमच्या मॉडेलच्या माध्यमातून बरीच गणना केली आहे. यात असे दिसून आले आहे की तिसरी लाट दुसर्‍या लाटेप्रमाणे एवढी प्रभावशाली नसेल. यात आम्ही तीन शक्यता वर्तवल्या आहेत. ऑगस्टच्या अखेरीस एखादा नवीन व्हेरिएंट आला, जो डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अधिक वेगवान पसरेल, तर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान तिसरी लाट येईल. त्यानुसार तिसरी लाट पहिल्या लाटेप्रमाणे असेल.

प्रोफेसर अग्रवाल यांनी सांगितले की तिसरी लाट भारतात डेल्टा व्हेरिएंटमुळे येईल, अशी शक्यता कमी वाटते. डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरणारा एखादा नवीन प्रकार भारतात आला तर काही प्रमाणात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. आम्ही दोन गोष्टी विचारात घेतल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना संसर्ग झाला आहे, ते बरे झाले. त्यांच्यातील काही लोकांची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. हे गेल्या वर्षाच्या अनेक अभ्यासात समोर आले आहे. 5 ते 20 टक्के लोकांची प्रतिकारशक्ती कोरोनाचा सामना करण्यासाठी संपली असल्यामुळे त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी काही दिवसांपूर्वी जगभरातील कोरोना संक्रमण आणि मृत्यूची संख्या पुन्हा वाढली असून कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीच्या टप्प्यात असल्याचे म्हटले होते. कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी नेमलेल्या आपातकालीन समितीच्या बैठकीला संबोधित करताना त्यांनी म्हटले की, दुर्दैवाने आपण आता तिसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत. डेल्टा वेरिएंट आता 111 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे. कोरोनाचा विषाणू सतत आपले स्वरुप बदल आहे, परिणामी आणखी संसर्गजन्य वेरिएंट उदयास येत आहेत.