रोहित पवार यांनी दोन दिवस इंधनांचे दर स्थिर राहिल्याबद्दल मानले सरकारचे आभार


मुंबई – देशातील अनेक राज्यांमधील इंधनाचे दर गगनाला भिडलेले आहेत. या दरांमध्ये घट तर होत नाहीच, पण त्यांत दररोज वाढच होत असल्यामुळे सर्वसामान्य माणूस अक्षरशः त्रस्त झाला आहे. देशाच्या राजकारणात मात्र या विषयावरुन टीकाटिप्पणी करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत.

विरोधक आता इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन चांगलेच आक्रमक झाले आहेत. काही जण सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत, तर काही ठिकाणी या दरवाढीविरोधात आंदोलनही सुरू आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही आता इंधन दरवाढीवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत! पण काही का असेना… यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत!