लोकसभेत विरोधकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान गदारोळ


नवी दिल्ली – आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून विरोधकांनी पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान जोरदार गदारोळ घातला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार करण्यात आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या मंत्र्यांची ओळख करुन देण्यासाठी उभे राहिले होते. यावेळी विरोधकांकडून गदारोळ घातला जात असल्यामुळे मोदींनी त्यांच्यावर निशाणा साधला. एवढ्या महिला, दलित आणि आदिवासींना मंत्री बनवण्यात आल्यानंतर संसदेत उत्साह असेल, असे मला वाटले होते, असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

मला वाटले होते की, एवढ्या महिला, दलित, आदिवासी मंत्री झाल्यामुळे संसदेत उत्साह असेल. यावेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे. पण काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्यामुळे आनंदी नाहीत. यामुळे त्यांची ओळख करुन देण्याची परवानगी ते देत नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या गदारोळानंतर हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचे सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणे योग्य नसल्याचे त्यांनी विरोधकांना सुनावले.

दरम्यान अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोरोनाविरोधातील लढाईत आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी लस घेताच कोरोनाविरोधातील लढाईत आपण बाहुबली बनतो, असे सांगत लस घेण्याचे आवाहन केले. मी आशा करत आहे की लसीचा कमीत कमी एक डोस तुम्ही सगळ्यांनी घेतला असेल. तरीही कोरोनाच्या प्रोटोकॉलचे तुम्ही पालन करा. लस ही हातावर(बाहू) देण्यात येते आणि जेव्हा लस हातावर देण्यात येते तेव्हा तुम्ही बाहुबली बनता. जर तुम्हाला कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनायचे असेल तर तुम्हाला हातावर लस घ्यावी लागेल. आतापर्यंत ४० कोटी पेक्षा जास्त लोक कोरोनाविरुद्धच्या लढाईत बाहुबली बनले आहेत. पुढे ही हे काम जोरात सुरु राहिल, असे मोदींनी म्हटले.

सर्व जगावर आणि मानवजातीवर कोरोनाने प्रभाव पडला असल्यामुळे या महामारीवर संसदेत चर्चा व्हायला हवी आणि या मुद्यावर प्राथमिकपणे चर्चा करायला हवी. तसेच सर्व सदस्यांकडून यावरील सूचना सूचना मिळाव्यात, जेणेकरून कोविडविरूद्ध लढा देण्यासाठी एक नवीन दृष्टिकोन मिळू शकेल आणि उणीवा दूर होऊन एकत्रित वाटचाल करु. मी सर्व खासदारांना आणि सर्व पक्षांना सभागृहात अत्यंत कठीण आणि तीव्र प्रश्न उपस्थित करण्याची विनंती करतो. पण त्याचसोबत उत्तर देण्यासाठी सरकारला शिस्तबद्ध वातावरणात वेळ द्यावा. यामुळे लोकशाहीला चालना मिळेल आणि लोकांचा लोकशाहीवरचा विश्वासही बळकट होईल, असे मोदी यांनी म्हटले.