एसटी बसद्वारे आषाढीसाठी मानाच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान


पंढरपूर : आजपासून पंढरपूर शहर आणि परिसरातील 10 गावात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या संकटात होत असलेल्या आषाढी यात्रेला भाविकांनी येऊ नये, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावात आजपासून संचारबंदीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे आषाढीसाठी काही मानाच्या पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान झाले आहे, तर काही वेळात उर्वरित पालख्याही पंढरीच्या दिशेने रवाना होतील. गेल्या वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटी बसने या मानाच्या पालख्या पंढरपूरला येत आहेत.

राज्यभरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे सावट पसरल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी राज्य सरकारने पंढरपूरकडे जाणाऱ्या वाऱ्या आणि पालख्या यांच्यावर निर्बंध लावले आहेत. यंदाही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता राज्य सरकारने राज्यातील पायी वारी करण्यावर निर्बंध लावले आहेत, पण मानाच्या दहा पालख्यांना बसने पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिलेली आहे.

पंढरीच्या वारीसाठी पहिला मान जळगाव जिल्ह्यातील संत मुक्ताई संस्थानच्या संत मुक्ताई पालखीचा असतो. जळगाव जिल्ह्यातील या मानाच्या पालखीचे आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने पहाटेच्या वेळी प्रस्थान झाले. राज्याच्या अध्यात्मिक आणि वारकरी संप्रदायात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई पालखीचे मोठे मानाचे स्थान आहे. राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध पालख्यांपेक्षा जळगाव जिल्ह्यातील ही पालखी सर्वात आधी निघत असते. संत मुक्ताई पालखीचे पंढरपूर येथेही पहिल्यांदा आगमन होत असते. दर वर्षी आषाढी पंचमीला जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई नगर तालुक्यातील कोथळी येथून संत मुक्ताई समाधी मंदिरापासून या वारीचे प्रस्थान होत असते. यामध्ये शेकडो दिंड्या आणि पालख्या हजारो वारकऱ्यांच्या सहभागी असतो. पण यंदा केवळ 40 वारकऱ्यांसह ही पालखी एसटीने रवाना झाली आहे.

पंढरपूरच्या दिशेने संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने प्रस्थान केले आहे. सजविलेल्या दोन शिवशाही बस मधून 40 वारकरी ग्यानबा तुकारामच्या जयघोषात मार्गस्थ झाले आहेत. टाळकरी मानकरी यांची निवड शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात आली आहे, त्यांच्यासोबत वैद्यकीय पथकही आहे. पायी वारी दरम्यान ज्या नित्य पूजा आरती होतात त्या बसमध्येच होणार असून त्रंबकेश्वरहुन निघालेली पालखी कुठेही न थांबता दुपारी 3 वाजेपर्यंत वाखरीला पोहोचणार आहे. ज्यांनी आपल्या खांद्यावर भागवत धर्माची पताका घेतली त्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने पहाटे 5 वाजता संजीवनी समाधी मंदिरातून प्रस्थान केले. सुरवातीला कुशावर्त तीर्थात माऊलींना मंगल स्नान आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर परंपरेप्रमाणे त्रंबकेश्वरच्या मंदिरापर्यंत पालखी मार्गस्थ झाली, पालखीच्या स्वागताला वरुणराजानेही हजेरी लावली. पंढरपूरच्या पायी वारीला परवानगी नसली तरी देखील निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर ते त्रंबकेश्वर मंदिरापर्यंत पायी चालत वारीचे समाधान घेतले. भर पावसात आणि भल्या पहाटे भाविकांनी दर्शनासाठी तर महिलांनी औक्षणासाठी हजेरी लावली.

शिवशाही एसटी बसमध्ये संत तुकोबांच्या पादुका विराजमान झाल्या. त्याआधी संत तुकोबांच्या पादुका मंदिरातून थेट इनामदार वाड्यात आल्या. इनामदार वाडा हे तुकोबांचे आजोळ घर असून येथे आरती झाल्यानंतर पादुका शिवशाहीने पंढरीकडे रवाना होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संत तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. त्यांच्या हस्ते पूजा पार पडली.

आज शिवशाही बसमधून पंढरपूरच्या दिशेने संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रस्थान करणार आहेत. ज्या बसमधून ही पालखी जाणार आहे त्याचे चालक सोमनाथ होले आहेत. सोमनाथ हे स्वतः वारकरी आहेत, मागील 22 वर्षांपासून राज्य परिवहन महामंडळात सेवा देत आहेत आणि आज अशाप्रकारे पालखी सोहळ्यात सहभागी होण्याच्या मान मिळाल्यामुळे त्यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले.

आज बसने श्री संत सोपानकाका आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार आहे. काही वेळातच मंदिरात भजन कीर्तनला सुरुवात होणार आहे. या नंतर शिवशाही बसने पालखी पंढरपूरकडे रवाना होतील. दरवर्षी लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारे पालखी सोहळे यंदा मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत.