अमोल कोल्हेंच्या वरदहस्त वक्तव्यावर आढळराव पाटलांचा पलटवार


पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामांच्या श्रेयांवरून संघर्ष उफाळून आला आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामावरून ठिणगी पडली आहे. त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्यावर टीका करताना थेट मुख्यमंत्र्यांवरच निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वरदहस्त असल्यामुळेच मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे असल्याचे कोल्हे म्हणाले होते. खासदार कोल्हे यांनी केलेल्या टीकेनंतर आढळराव पाटील यांनी पलटवार केला.

थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केल्यामुळे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनीही खासदार कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. आढळराव पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, मी खासदार असताना बायपास रस्त्याचे काम सुरु झाले होते. या कार्यक्रमाला मला डावलण्यात आले. माझा, मुख्यमंत्र्यांचा एकही फोटो तिथे नव्हता. या कार्यक्रमात मला बोलवावे एवढीच माझी अपेक्षा होती. कोल्हेंनी स्वतःची लायकी पाहून बोलावे. स्थानिक विषयांत पवार आणि ठाकरेंचा प्रश्न येतो कुठे?, असे आढळराव पाटील म्हणाले.

थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या अमोल कोल्हे यांनी स्वत:ची लायकी पाहून वक्तव्य करावे. हाच लबाड कोल्हा जो शिवसेनेतून मोठा झाला आणि आता शिवसेनेवरच बोलत आहे. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करायचा गुणधर्म आहे काय? अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तरुण आणि म्हातारे असा भेद करत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कोल्हे करत आहेत. मी म्हातारा असलो, तरी माझ्याकडे बुद्धिमत्ता आहे, समज आहे. यांच्यासारखा नटसम्राट नसल्याचे म्हणत आढळराव पाटील यांनी कोल्हे यांना प्रत्युत्तर दिले आहे.