आदित्य शिरोडकर यांनी ‘या’ कारणासाठी सोडली इंजिनाची साथ


मुबंई : काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आदित्य शिरोडकर यांनी हा निर्णय का घेतला याबाबत चर्चा सुरु असतानाच या पार्श्वभूमीवर आदित्य शिरोडकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आदित्य शिरोडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले. त्यांची कार्यपद्धत पाहून, त्यांचे काम पाहून, प्रेरित झालो आणि हा निर्णय घेतला. यापुढे आयुष्यभर जे समाजकार्य करु ते शिवसेनेमार्फतच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करु, असे आदित्य शिरोडकर यांनी म्हटले आहे.

‘मनसे सोडण्याचा निर्णय हा काही एका दिवसात घेतलेला नाही, असे अनेक प्रसंग मागच्या अनेक वर्षांत आले. माझा निर्णय हा काही काल-परवा झालेला नाही. पण सगळ्याच गोष्टी मला मीडियासमोर सांगता येणार नाहीत. नेत्यांबरोबर मतभेद सुरू झाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे आदित्य शिरोडकर यांनी म्हटले आहे.

मनसेतील पदाधिकारी, मनविसेतील कार्यकर्ते बरीच लोक संपर्कात आहेत, त्यांच्याबद्दल शिवसेना संघटनेत वरिष्ठांशी बोलून ते जो काय निर्णय घेतील, त्याप्रमाणे पुढची भूमिका ठरवू असा दावाही आदित्य शिरोडकर यांनी केला आहे. शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही, तर समाजसेवा ध्यानात ठेवूनच घेतला आहे. पक्ष यापुढे जी काय जबाबदारी देईल, त्यावर काम करु असे आदित्य शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे.