काल दिवसभरात देशात 38,949 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 542 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून 40 हजारांच्या आसपास येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आज 38,949 कोरोना रुग्णांची भर पडली आहे, तर 542 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल दिवसभरात देशात 40,026 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या देशात चार लाखांहून जास्त सक्रिय रुग्णसंख्या आहे, तर चार लाख 30 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहे. देशात आतापर्यंत चार लाख 12 हजार 531 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत एकूण तीन कोटी एक लाख 83 हजार लोक कोरोनातून बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत तीन कोटी 10 लाख 26 हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 39 कोटी 53 लाख कोरोनाचे डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर 1.33 टक्के आहे तर रिकव्हरी दर हा 97 टक्के एवढा आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. आज 8,010 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 391 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 52 हजार 440 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के आहे. राज्यात आज 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही.

राज्यात सध्या 1 लाख 7 हजार 205 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदुरबार (70), हिंगोली (71), यवतमाळ (23), गोंदिया (66), चंद्रपूर (22) या पाच जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 17, 401 सक्रिय रुग्ण आहेत. जळगाव, परभणी, जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 979 रुग्णांची नोंद झाली आहे.