पंकजा मुंडेंच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याचे बँक खाते सील


औरंगाबाद – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. कामगारांची भविष्य निधीची रक्कम जमा न केल्यामुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आल्याचे समोर आले आहे.

वैद्यनाथ कारखान्याचे बँक खाते औरंगाबादच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने सील केले आहे. त्याचबरोबर त्यातून ९२ लाख रुपये जप्त देखील करण्यात आलेले आहेत. वैद्यनाथ कारखान्याने पीएफची रक्कम थकवली होती, त्यांना नोटीस देण्यात आली होती. पण तरीही रक्कम न भरण्यात आल्यामुळे कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे व त्यातून रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद पीएफ ऑफिसचे क्षेत्रीय आय़ुक्त जगदीश तांबे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.

२०१८ ते ऑगस्ट २०१९ कालावधीत कारखान्याने पीएफची रक्कम भरणा केली नव्हती. पीएफपोटी थकीत रक्कम १ कोटी ४६ लाख रुपये असल्यामुळे थकीत रक्कम वसुली सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशाने प्रवर्तन अधिकारी वानखेडे यांनी वसुली नोंदवली, उर्वरित रक्कम वसुलीसाठी कार्यवाही सुरू असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

तर, परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बँक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेले वृत्त चुकीचे असल्याचे कारखान्याचे कार्यकारी संचालक जी. पी.एस. दीक्षितूलू यांनी म्हटले आहे. वैद्यनाथ कारखाना सध्या दुष्काळ आणि अन्य आर्थिक कारणांमुळे आर्थिक अडचणीतून जात आहे. अशा कठीण परिस्थितीत अशा प्रकारचे वृत्त देणे आणि शेतकर्‍यांचे भवितव्य धोक्यात आणणे हे एकूणच राजकीय खोडसाळपणाचे आहे. कारखान्याचे असे कोणतेही खाते सील झालेले नसल्याचे कार्यकारी संचालक दीक्षितूलू यांनी म्हटले आहे.