कोरोनाबाधितांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर व्यक्त केली काळजी


मुंबई – सध्याच्या घडीला संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. देशातील जवळपास सर्वच राज्यात कोरोनाचे थैमान सुरुच आहे. त्यापैकी काही राज्यांमध्ये कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज वाढती कोरोना रुग्णसंख्या असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी महाराष्ट्रासह केरळच्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली असून राज्यांना कोरोनाशी लढण्याचा कानमंत्रही दिला आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासह केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या चर्चेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या देखील उपस्थित होत्या. पंतप्रधान यावेळी म्हणाले, आधी तज्ज्ञांचे असे म्हणणे होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात ज्या राज्यांमधून झाली आहे, तेथील परिस्थिती आधी नियंत्रणात येईल. पण, महाराष्ट्र आणि केरळमधील कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढतच आहे. ही आपल्या सर्वांसाठी आणि देशासाठीही गंभीर चिंतेची बाब आहे.

देशातले ८० टक्के कोरोनाबाधित हे याच सहा राज्यातील आहेत. तसेच ८४ टक्के मृत्यूही याच राज्यांमध्ये झाले आहेत. ही चिंताजनक बाब असल्याचेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, ज्या राज्यांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे, त्या राज्यांनी जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक उपाय करुन कोरोनाची तिसरी लाट सुरुवातीपासूनच रोखायला हवी. कारण जसजशी रुग्णवाढ होते, तसतसा हा व्हायरस आपली रुपे बदलत आहे आणि अधिक धोकादायक होत आहे.

नरेंद्र मोदी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांबद्दल म्हणतात की, कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आपण आधी ही रणनीती अवलंबली आहे. आपल्याला आत्ताही तेच करायचे आहे. टेस्ट, ट्रॅक, ट्रिट आणि आता लस…याच रणनीतीच्या आधारावर आपल्याला पुढे जायचे आहे. तसेच ग्रामीण भागावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवे, तसेच मायक्रो कन्टेनमेंट झोनवर अधिक लक्ष द्यायला हवे. त्याचबरोबर संसर्ग जास्त असलेल्या भागांमध्ये चाचण्या जास्तीत जास्त वाढवायला हव्यात आणि लसीचा वापर कोरोनाशी लढण्याचे एक अस्त्र म्हणून करायचा आहे.