भारत-पाकिस्तान मैत्री संबंधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा अडथळा


ताश्कंद: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासोबत मैत्रीचे संबंध व्हावेत अशी आमचीही इच्छा आहे, पण भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा त्यामध्ये अडथळा असल्याचे म्हटले आहे. सध्या उजबेकिस्तानच्या दौऱ्यावर इम्रान खान आले असून यावेळी त्यांनी तालिबानबाबतच्या प्रश्नाचा उल्लेख ऐकताच पत्रकाराला टाळले.

मध्य आणि दक्षिण आशियाई देशांच्या दोन दिवसांची परिषद ताश्कंदमध्ये होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी इम्रान खान ताश्कंदमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी एएनआयच्या प्रतिनिधींने त्यांना भारत पाकिस्तान चर्चेबाबत विचारले. इम्रान खान यांनी त्यावर म्हटले की, दोन्ही देशांनी एकत्र राहावे, अशी आमची इच्छा आहे. आम्ही भारताची प्रतिक्षा करत आहोत. पण, दोन्ही देशांच्या संबंधामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा अडथळा असल्याचे इम्रान खान यांनी म्हटले. तालिबान आणि पाकिस्तानच्या संबंधाबाबत प्रश्न पूर्णपणे विचारण्याआधीच इम्रान खानी यांनी पत्रकाराला टाळले.

दरम्यान, अफगाण शांतता संमेलनाचे पाकिस्तानने आयोजन केले आहे. यामध्ये अफगाणिस्तानमधील अनेक नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. अफगाणिस्तान सरकारच्यावतीने कोण सहभागी होईल, याबाबत काहीही स्पष्ट झाले नाही. तर, तालिबानने या संमेलनात उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.