रिझर्व्ह बँकेने लातूरच्या या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द


मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक संकटात सापडलेल्या लातूरमधील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने ही कारवाई अपुरे भांडवल आणि व्यवसाय चालू ठेवण्यास असमर्थ असल्याने केली आहे. आरबीआयने लातूर जिल्ह्यामधील निलंग्यातील डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

बँकेची मागील अनेक महिने आर्थिक परिस्थिती बेताची बनली होती. त्यामुळे बँकेकडून व्यवसाय सुरु ठेवणे कठीण झाले होता. रिझर्व्ह बँकेने त्याची दखल घेत डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. त्याचबरोबर सहकार आयुक्तांना बँकेवर लिक्विडेटर नियुक्त करून बँक गुंडाळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर नागरी सहकारी बँकेला या कारवाईनंतर ठेवी स्वीकारणे आणि कर्ज वाटप करणे, बँकिंग व्यवसाय सुरु करण्यास मनाई करण्यात आली आहे. बँक लवकरच कायदेशीररित्या बंद करण्याची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

रिझर्व्ह बँकेने यापूर्वी डिसेंबरमध्ये कोल्हापुरातील सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला होता. २०१३ मध्ये सुभद्रा लोकल एरिया बँकेला बँकिंग परवाना मिळाला होता. पण बँकेची आर्थिक स्थिती मागील काही वर्षे डळमळीत झाली. रिझर्व्ह बँकेने याबाबत तातडीने लक्ष घातले. दैनंदिन बँक व्यवहारासाठी बँक सक्षम नाही, असे कारण देत रिझर्व्ह बँकेने बँकिंग नियमन कायदा १९४९ च्या कलम २२ (४) अंतर्गत सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द केल्याचे जाहीर केले होते. त्याआधी रिझर्व्ह बँकेने दि कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रद्द केला होता.