काल दिवसभरात 41 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; तर 581 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावात काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. पण, कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. दरदिवशी 40 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. गुरुवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 41,806 नव्या कोरोनाबाधितांनी नोंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर काल 39,130 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या सध्या चार लाखांहून अधिक आहे. देशात 4 लाख 32 हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 4 लाख 11 हजार 989 लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण 3 कोटी 1 लाख 44 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत तीन कोटी 9 लाख 87 हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 14 जुलैपर्यंत देशभरात 39 कोटी 13 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 34 लाख 97 हजार लसींचे डोस देण्यात आले आहेत. अशातच, आयसीएमआरने आतापर्यंत 43 कोटी 80 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 19.43 लाख कोरोना सॅम्पल तपासण्यात आले आहेत. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून कमी आहे.

दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात 8 हजार 602 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 067 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 44 हजार 801 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के झाले आहे.

काल (बुधवारी) राज्यात 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 06 हजार 764 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 80 हजार 771 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 309 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

नंदूरबार (68), हिंगोली (72), यवतमाळ (21), गोंदिया (64), चंद्रपूर (90) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 17,389 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर नंदूरबार, भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधिताची नोंद झाली नाही.

कालच्या तुलनेत मुंबईत आज रुग्णसंख्या वाढली आहे. मुंबईत काल 441 कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. आज मुंबईत 625 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 582 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,04,259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,989 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 928 दिवसांवर गेला आहे.