इंदुरीकर महाराज महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते, तेव्हा तू कुठे होतीस?; तृप्ती देसाईंची हेमांगी कवीला विचारणा


पुणे – अभिनेत्री हेमांगी कवीची सध्या ‘ब्रा, बुब्स आणि बाई’ या पोस्टवरुन सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनीही तिच्या त्याच पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. इंदुरीकर महाराज महिलांविषयी बदनामीकारक वक्तव्य करत होते, तेव्हा तू कुठे होतीस? आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोडविरोधात रान पेटवले, तेव्हा तू कुठे होतीस असा सवाल देसाईंनी उपस्थित केला आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तृप्ती देसाई यांनी आपली मते प्रकट केली आहेत. ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. पण आम्हाला तर त्यावेळी प्रवीण तरडे, हेमांगी कवी कोणीच जाहीर पाठिंबा दिला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. जेव्हा मासिक पाळीच्या विषयावरुन दुजाभाव केला जातो, बंदी घातली जाते, तेव्हा आम्ही आंदोलने केली, पण अशा वेळी हे लोक का साथ देत नाहीत, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली आहे.

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये तृप्ती देसाई म्हणतात,सदर अभिनेत्री आम्ही शिर्डीच्या ड्रेसकोड च्या विरोधात रान पेटवले तेव्हा कुठे होत्या मला माहित नाही… त्यांच्या या जाहीर लेखाचे स्वागतच आहे , सर्वांनीच आता जाहीरपणे व्यक्त होणे ही काळाची गरज आहे.परंतु मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की ज्या महिला या संदर्भात गॉसिप्स करतात किंवा उघडपणे बोलत नाहीत, किंवा विकृत मानसिकतेचे पुरुष असोत त्यांचीच तर मानसिक बदलण्यासाठी आमचाही प्रयत्न आहे आणि तो करताना ट्रोलिंग, शिवीगाळ, हल्ले याला आम्हालाही सामोरे जावे लागले. परंतु त्यावेळी मात्र ना प्रवीण तरडे यांनी जाहीर पाठिंबा दिला, ना हेमांगी यांनी….

जेव्हा महिलांना मासिक पाळी या विषयावरून दुजाभाव केला जातो ,अनेक ठिकाणी बंदी घातली जाते याविषयीही आम्ही कृतीत आंदोलने केली परंतु अशा वेळेला असे लोक का साथ देत नाहीत हे समजले नाही. इंदुरीकर तर जाहीरपणे महीलांच्या वेशभूषा वर आणि महिलांबाबत बदनामीकारक वक्तव्य अनेक कीर्तनातून करत असत त्यावेळेला हे सर्व कुठे होते असाच प्रश्न पडतो? असो उशिरा का होईना परंतु धाडस करून लिहायला तरी सुरुवात केली “हे ही नसे थोडके”. मनापासून शुभेच्छा.

माझी तर या जानेवारीपासूनच मनात एक संकल्पना अशी आहे की आमच्या भूमाता फाऊंडेशनच्या माध्यमातून यावर्षीपासून आपल्या महाराष्ट्रात” #नो_ब्रा_डे” साजरा केला पाहिजे,.कृतीतून जेवढा संदेश जाईल तेवढा बदल होण्यास सोपे जाते.विरोध होईलच परंतु पुढाकार घेऊन करणेही तितकेच गरजेचे आहे. आम्ही जेव्हा हा दिवस साजरा करू तेव्हा स्वतःहून तुम्ही यात सहभागी व्हाल हीच अपेक्षा… त्याचबरोबर त्यांनी या पोस्टमध्ये हेमांगी कवीला टॅग केलं असून तिची पोस्ट शेअरही केली आहे.