देशात काल दिवसभरात 38 हजार नवे कोरोनाबाधितांची नोंद, तर 624 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – कोरोनाची दुसरी लाट देशात मंदावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. परंतु, अद्याप धोका कमी झालेला नाही. दररोज जवळपास 40 हजारांच्या आसपास नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 38,792 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 624 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात 41,000 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील कोरोनाबाधितांच्या सक्रिय रुग्णांची चार लाखांहून अधिक आहे. सध्या 4 लाख 29 हजार 946 रुग्ण कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत एकूण 4 लाख 11 हजार 408 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात दिलासादायक गोष्ट म्हणजे, आतापर्यंत एकूण 3 कोटी 1 लाख 4 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 9 लाख 46 हजार रुग्ण कोरोनाबाधित झाले होते.

देशात आतापर्यंत 38 कोटी 76 लाखांहून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच काल दिवसभरात 37 लाख 14 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडु, बिहार, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत 18 ते 44 वयोगटातील 50 लाखांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 7 हजार 243 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 978 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 38 हजार 734 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.21 टक्के झाले आहे.

महाराष्ट्रात काल 196 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 33 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 4 हजार 906 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 74 हजार 463 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 607 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.

नंदूरबार (70), हिंगोली (75), यवतमाळ (22), गोंदिया (63) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,663 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर नंदूरबार, भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 441 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 600 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,03,677 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,950 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 925 दिवसांवर गेला आहे.