चाचणीमध्ये सर्वात अत्याधुनिक आणि घातक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र झाले नापास


नवी दिल्ली – चाचणीदरम्यान भारताच्या ‘ब्रह्मोस’ या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र अपेक्षित लक्ष्याचा भेद घेण्यात अपयशी ठरल्याचा दुर्मिळ प्रकार सोमवारी घडला. ४०० किलोमीटरच्या रेंजमधील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम असणारे हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान अपेक्षित अंतर पूर्ण करण्याआधीच पडले. सोमवारी ही चाचणी ओडिसाच्या समुद्रकिनाऱ्यावर घेण्यात आली होती. सामान्यपणे ४०० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद घेणाऱ्या या क्षेपणास्त्राच्या नव्या व्हर्जनची चाचणी घेतली जात होती. ४५० किमी दूरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आला होता, जो अपयशी ठरला.

डागल्यानंतर अवघ्या काही काळामध्येच क्षेपणास्त्र पडले. ही चाचणी सोमवारी सकाळी करण्यात आली. हे असे का घडले या मागील कारणांचा तपास डिफेन्स रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे (डीआरडीओ) वैज्ञानिक आणि ब्रह्मोस अरोस्पेस कॉर्पोरेशनच्या टीम्सकडून केला जाणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सुत्रांनी दिली.

भारताचे ‘ब्रह्मोस’ हे सर्वात अत्याधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची भारत आणि रशियाने मिळून निर्मिती केली आहे. हे क्षेपणास्त्र चाचणीदरम्यान फारच कमी वेळा अपयशी ठरले आहे. प्राथमिक अंदाजानुसार लॉन्चिंगच्या वेळी झालेल्या तांत्रिक गोंधळामुळे चाचणी अपयशी ठरल्याचे सांगितले जात आहे. पण चाचणी दरम्यान नक्की काय गोंधळ झाला हे संपूर्ण तपासणी केल्यानंतर स्पष्ट होईल, असे सुत्रांनी म्हटले आहे.