राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा निर्णय; मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये सुरु करणार शाखा


चित्रकूट – मागील पाच दिवसांपासून उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या चित्रकूटमध्ये सुरु असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठकीचा आज शेवटचा दिवस होता. संघटनेला मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले. तसेच या शिबिरामध्ये राजकीय विचारमंथनही झाले. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बैठकीदरम्यान पश्चिम बंगालसंदर्भात मोठा निर्णय घेतल्याचे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

संघटनेची पाळेमुळे पश्चिम बंगालमध्ये मजबूत करण्यासाठी राज्याची तीन खंडांमध्ये विभागणी करुन काम करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य कार्यालय कोलकातामध्ये असेल, मध्य बंगालमधील कारभार वर्धमानमधून पाहिला जाईल तर राज्यातील उत्तरेकडील भागामधील संघाचे काम सिलीगुडीमधून हाताळले जाईल. पुढील वर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाने ही रचना केल्याचे सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे संघाने आता मुस्लीम बहुल भागामध्ये शाखा सुरु करण्याचा निर्णयही घेतला आहे.

कोरोना कालावधीत बंद पडलेल्या संघाच्या कार्यक्रमांबरोबरच शाखाही पुन्हा सुरु करणार असल्याची घोषणा चित्रकूटमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता संघाने देशभरातील मुस्लिम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर केवळ मोठ्या आणि लहान शहरांमध्ये असलेला संघाचा प्रभाव आता गावागावांमध्ये पोहचवण्यासाठी या बैठकीमध्ये रणनिती आखण्यात आली आहे. केवळ हिंदूच नाही तर मुस्लिमांनाही संघाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यावर भर देण्यासंदर्भातील धोरणही या चिंतन बैठकमध्ये निश्चित करण्यात आले आहे.

आरएसएसच्या चिंतन बैठकीमध्ये प्रांत प्रचारकांना त्यांच्या कामाचे स्वरुप समजावून सांगण्याबरोबरच पुढील वर्षभरामध्ये संघाकडून काय काय कार्यक्रम आखण्यात आले आहेत, याची कल्पना सध्या तरी देण्यात आली आहे. तसेच संघाने काही महत्वाच्या पदांमध्ये बदल केला आहे. दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक जलधर महतो यांना सह क्षेत्र प्रचारक ही जबाबदारीही देण्यात आली आहे. तर प्रांत प्रचारक प्रशांत भट्ट यांना दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पूर्वेकडील ओडिसा आणि बंगालच्या प्रांतामधील सह क्षेत्र प्रचारक रामापदो पाल यांच्यावरही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशींना देण्यात आली आहे. चंढीगडमध्ये त्याचे मुख्य कार्यालय असेल. त्याचप्रमाणे आता भैय्याजी जोशी संघ आणि विश्व हिंदू परिषदेदरम्यानचे संयोजक असतील. तसेच डॉ. कृष्ण गोपाल यांनान विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवण्यात आले आहे. संघ आणि भाजपमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी सर कार्यवाहक अरुण कुमार यांना देण्यात आली आहे.