मला ज्या दिवशी येथे राम नाही असे वाटेल, त्या दिवशी बघू – पंकजा मुंडे


मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सध्या राज्यात होत आहे. तसेच प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे मुंडे समर्थक देखील कमालीचे नाराज झाले आहेत. याचा निषेध म्हणून मुंडे समर्थकांनी राजीनामे द्यायलाही सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर काल पंकजा मुंडे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांची भेट घेतली. त्यानंतर आज त्या मुंबईत परतल्या. यावेळी त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले.

पंकजा मुंडे यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाल्या की, पदाची आणि खुर्चीची लालसा मला नाही. राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्याचे राजीनामे नामंजूर केले आहेत. माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू, असे त्या म्हणाल्या. दबावतंत्र मला करायचे नाही. काल मी दिल्लीला संघटनेच्या कामासाठी गेले होते. मला कुणीही झापले नाही. पंतप्रधान मोदी, अध्यक्ष नड्डा यांच्याकडून अत्यंत सन्मानाची वागणूक मिळाली. त्याचबरोबर पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांची नाराजी दूर कराल, असा विश्वास व्यक्त केला आहे. मोठा नेता नेहमीच त्याग करतो, असेही त्या म्हणाल्या. जोपर्यंत शक्य आहे, तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कुणालाही घाबरत नाही, माझ्यावर निर्भिड राजकारणाचे संस्कार असल्याचे त्या म्हणाल्या. मला पक्षाने खूप दिले आहे, पक्षाने दिलेले मी लक्षात ठेवते. जे दिले नाही, ते तुम्ही लक्षात ठेवा. ज्या दिवशी मला असे वाटेल येथे राम नाही, त्या दिवशी बघू, असेही त्या म्हणाल्या.

मी जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. मला राजकारणात मुंडे साहेबांनी आणले, कारण मला वंचितांची सेवा करायला मिळायला हवी. तळागाळातील लोकांसाठी गोपीनाथ मुंडेंनी काम केले. मला राजकारणात आणताना त्यांनी मोठा विचार मनात घेऊन आणले. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा, यासाठी आम्हाला राजकारणात आणले नाही. मी राजकारणात कोणतेही पद मिळवण्यासाठी आले नाही. हे आपले संस्कार नाहीत. मी राजकारणात लोकांची कामे करण्यासाठी आले. माझा परिवार सर्व कार्यकर्त्यांचा परिवार आहे. मी कार्यकर्त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नसल्याचे त्या म्हणाल्या. त्या भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना म्हणाल्या की, माझ्या समाजाच्या मंत्र्यांला मी अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असे त्या म्हणाल्या. निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले. कराड यांचे वय 65 आहे. ते आपल्या समाजाचे आहेत, मी त्यांचा अपमान करणार नसल्याचे त्या म्हणाल्या.