काल दिवसभरात 32,906 कोरोनाबाधितांची नोंद, तर 49 हजार 07 रुग्ण कोरोनामुक्त


नवी दिल्ली – देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट काहीअंशी ओसरत आहे. याच दरम्यान दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसागणिक घट होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 32 हजार 906 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2020 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातच काल दिवसभरात 49 हजार 07 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 97.22 टक्क्यांवर पोहोचला आहे.

देशात आतापर्यंत 8 कोटी 14 लाख 67 हजार 646 हून अधिक कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच काल दिवसभरात 40 लाख 65 हजार 862 लसीचे डोस देण्यात आले आहेत. आतापर्यंत 30,66,12,781 लोकांना पहिला लसीचा डोस, तर 7,48,54,865 लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशात लसीकरण मोहीमेचा तिसरा टप्पा सुरु केल्यानंतर 18 ते 44 वयोगटातील 11,41,34,915 नागरिकांना लसीचा पहिला डोस, तर 38,88,828 नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडु, बिहार, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांत 18 ते 44 वयोगटातील 50 लाखांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. काल दिवसभरात 7,603 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 15 हजार 277 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 27 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.15 टक्के आहे.

काल राज्यात 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 48 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यात 1 लाख 8 हजार 343 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (71), हिंगोली (75), यवतमाळ (22), गोंदिया (63) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 925 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज परभणी, यवतमाळ, भंडारा जिल्ह्यात शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1640 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,41,86,449 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,65, 402 (13.95 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,82,476 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,654 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 478 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 701 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,03,077 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,120 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 926 दिवसांवर गेला आहे.