चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला उर्मिला मातोंडकर यांचे नामोल्लेख न करता प्रत्युत्तर


पुणे – पक्ष बांधणीच्या कामाला लागण्याचे आदेश मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्यानंतर शिवसेनेने पुन्हा शिव संपर्क अभियान सुरू केले आहे. राज्यभर शिवसेनेकडून शिव संपर्क अभियान उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ पुण्यात करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून पलटवार केला.

उर्मिला मातोंकर पुण्यात शिवसंपर्क अभिनायानाच्या निमित्ताने आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांना यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविषयी विचारण्यात आले. त्यावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, संजय राऊत हे अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करून त्यांच्यावर चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत. मी त्यावर काय बोलू… ते रॉक स्टार असल्याचे उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

राज्यपालांकडून अद्यापही विधान परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय करण्यात आलेला नाही. त्यावर मातोंडकर म्हणाल्या, तो एक वेगळाच विषय आहे. ती यादी राज्यपाल मान्य करतील, तेव्हा करतील. त्यामुळे आपले काम थांबत नाही. तसेच मी एखादी गोष्ट डोक्यात ठेवून राजकारणात आलेली नाही. राज्यपालांकडून करण्यात येणाऱ्या नियुक्तीवर जर बोलायचे झाले तर तोंडावर मास्क आहे, तोच बरा असल्याचे म्हणत त्यांनी अधिकच भाष्य करणे टाळले.

उर्मिला मातोंडकर यांनी नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या मदतीवरही निशाणा साधला. २०१९ मध्ये जेव्हा राज्यात पूर आला, तेव्हा मी सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे चार दिवसाच्या दौर्‍यावर गेले होते. मी प्रसार माध्यमांना देखील ही गोष्ट सांगितली होती आणि त्यांनी माझे काम पाहिले आहे. हल्लीचे नेते एक केळी वाटतात आणि चार फोटो काढतात, अशा शब्दात त्यांनी चमकोगिरी करणाऱ्या नेत्यांना सुनावले.

एक ट्विट करून भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. सामनाचे कार्यकारी संपादक तसेच सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊतजी, हे फादर स्टॅन सामी जे न्यायालयाच्या निर्देशानुसार नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपामुळे कारागृहात होते; त्यांचा मृत्यू झाल्यामुळे प्रचंड अस्वस्थ झालेले दिसतात, अशी टीका केली होती.