…तर शिवसेनेच्या खांद्याला खांदा लावून काम करु; नितेश राणेंचे मोठे वक्तव्य


मुंबई – शिवसेनेसोबत जुळवून घेण्याचे संकेत ठाकरे कुटुंबाला सतत लक्ष्य करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांनी दिल्यामुळे सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. नितेश राणे यांनी शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात बोलताना राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या नेतृत्वाने आदेश दिल्यास खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान शिवसेनेने नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

सागररत्न बाजपारपेठेचा लोकार्पण सोहळा सिंधुदूर्गमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितेश राणे बोलत होते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते दीपक केसरकर, खासदार विनायक राऊतदेखील उपस्थित होते. दरम्यान नितेश राणे यांनी आधी ठाकरे कुटुंबाबाबत केलेल्या वक्तव्यांप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे.

राजकीय कार्यक्रम तो नव्हता. हा प्रकल्प १३ वर्ष रखडलेला होता, त्यामुळे तो पूर्ण झाल्याचा आनंद सर्वांना होता. एक लक्षात घेतले पाहिजे की, नितेश राणे यांच्याशिवाय कोणीही राजकीय भाषण केले नाही. त्यांनी विकासात सर्वांनी एकत्र असले पाहिजे असे म्हटले आहे. आम्हाला ही भूमिका मान्य आहे. पण नितेश राणेंना शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकेल, असे वाटत असेल तर त्यांनी प्रतिविधानसभा घेतली, तेव्हा काय वक्तव्य केले हे पाहिले पाहिजे. आदित्य ठाकरेंचा डीएनए तपासला पाहिजे, असे म्हणणे योग्य आहे का ? हे चरित्रहनन असून साध्या कुटुंबातील व्यक्तीनेही सहन केले नसते, असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे सौम्य दिसत, असले तरी अत्यंत कडक आहेत. त्यांनी फोन करावा अशी अपेक्षा करता. माझा मुलगा चुकला असल्याचे सांगत नारायण राणे यांनी अनेकदा दिलगिरी व्यक्त केली आहे. ते सज्ञान आहेत आणि त्यांनीच फोन केला नसल्याचे वक्तव्य केले. यावेळी अनेक फडणवीस, सुधीर मुनगंटीवार असे ज्येष्ठ नेते तिथे उपस्थित होते. त्यांनी थांबवायला हवे होते. आम्ही विकासात राजकारण करत नाही आणि हेच त्यांनीही केले पाहिजे, असे मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. संबंध एकतर्फी कधीच सुधारत नाहीत. त्यांनी आपली वक्तव्ये तपासून पाहिली पाहिजेत. त्याच्यात सुधारणा केल्यानंतर शिवसेना आणि भाजप एकत्र येण्याची ही नांदी आहे, म्हणण्याचा त्यांना नैतिक अधिकार असल्याचे दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले.

सिंधुदूर्ग जिल्हा, कोकण आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी कोणासोबतही एकत्र काम करण्याची वेळ आली आणि आमच्या पक्षनेतृत्वाचा आदेश आला, तर आम्ही सगळे कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून काम करु, असे नितेश राणेंनी सांगितले. पुढे ते म्हणाले की, राज्यात काही दिवसांपूर्वी युतीची चर्चा सुरु होती, ती नंतर बंद झाली. पण आता भाजप आणि शिवसेनेचे नेते एकाच व्यासपीठावर आल्यामुळे युतीचे चाहते सुखावले असतील. आज रात्री त्यांना चांगली झोप लागेल.