जातीनिहाय जनगणना देशात झालीच पाहिजे – रामदास आठवले


मुंबई : जातीनिहाय जनगणना देशात झालीच पाहिजे, ती काळाची गरज असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. दरम्यान, रविवारी जागतिक लोकसंख्या दिवस होता. रामदास आठवले यांनी त्यानिमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रामदास आठवले यांनी ही मागणी केली.

कोणत्याही धर्माशी जनगणनेचा संबंध जोडू नये. देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला मदत मिळेल, असे रामदास आठवले म्हणाले. तसेच, देशात कोणत्या जातींची लोकसंख्या किती आहे, याची माहिती जातीनिहाय जनगणना केल्यानंतर मिळेल. मी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. याबाबत जनगणना आयोगासोबत सुद्धा चर्चा करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

याचबरोबर, समाजातील प्रत्येक वर्गापर्यंत सरकारच्या योजना जातीनिहाय जनगणना झाल्यामुळे पोहोचण्यास मदत मिळेल, असे ते म्हणाले. याचबरोबर, जे लोक आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास आहेत, त्यांना आरक्षण देण्याची गरज असल्याचे म्हणत आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही. पण, ही मर्यादा सामाजिक न्यायासाठी ओलांडली पाहिजे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले.

दरम्यान, लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी देशातील काही राज्यांमध्ये कायदा तयार करण्यावर जोर दिला जात आहे. नवीन लोकसंख्या धोरण उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये राबविण्यात येणार आहे. दोन्ही राज्यांनी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच, दोनपेक्षा अधिक मुले असतील, तर त्यांना सरकारी योजनांपासून दूर ठेवण्याबाबतचा विचार केला जात आहे. या विषयाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.