सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, अन्यथा प्रत्येकाला पाच हजार रुपये प्रवास भत्ता द्या


मुंबई – मुंबईकरांना कोरोनामुळे निर्बंधांबरोबरच प्रवास करतानाही हाल सोसावे लागत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर लोकलमधून प्रवास करण्यास सर्वसामान्यांना बंदी घालण्यात आली होती. पण, सध्या दुसरी लाट ओसरत असून, नागरिकांकडून लोकल प्रवासास परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. असे असतानाही अद्याप बंदी हटवण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजपने मुंबईकरांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधत राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. मुंबई व उपनगरातील सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची राज्य सरकारने तात्काळ परवानगी द्यावी, अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा ५ हजार रुपये द्यावेत, अशी मागणी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.

केशव उपाध्ये भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. उपाध्ये म्हणाले, गेली दीड वर्षे राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवासापोटी या वर्गाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो, त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुंबईतील प्रवासी खासगी वाहतुकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव आहे, अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागली आहे, असे केशव उपाध्ये म्हणाले.

आजवर शिवसेनेला मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने भरभरून साथ दिली आहे. या सर्वसामान्य जनतेची जाणीवच महाआघाडी सरकारला नसल्याचे चित्र दिसत आहे. उपनगरी रेल्वे प्रवास राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच बंद असल्यामुळे याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज असल्याची भूमिका उपाध्ये यांनी मांडली. राज्य सरकारने सात हजार कोटी रुपये लस खरेदीसाठी राखून ठेवल्याचे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले होते. हे सात हजार कोटी सामान्य नागरिकांना प्रवास भत्ता म्हणून द्यावेत व सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा, असा सल्ला उपाध्ये यांनी सरकारला दिला आहे.