नव्या रेल्वे मंत्र्यांचा धडाका; बदलल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा


नवी दिल्ली – नरेंद्र मोदींनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पियुष गोयल यांच्याकडे असलेले रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आले. गुरुवारी माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारला असून कामकाजाला सुरुवात केली. दरम्यान त्यांनी पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेतला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. दोन शिफ्टमध्ये रेल्वे कर्मचारी काम करतील असा, आदेशच त्यांनी दिला आहे.

सर्व कार्यालये आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील, असा आदेश रेल्वेमंत्र्यांनी दिला आहे. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ४ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते १२ असेल. या आदेशाची अमलबजावणी आजपासून सुरु झाली असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डी. जे. नारायण यांनी दिली आहे.

रवीशंकर प्रसाद यांच्या माहिती व तंत्रज्ञानमंत्री खात्याची जबाबदारीदेखील अश्विनी वैष्णव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. रवीशंकर प्रसाद यांच्याप्रमाणे त्यांनाही ‘ट्विटर’ विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशात व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला येथील कायद्याचे व नियमांचे पालन करावे लागेल, असे नवनियुक्त माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी मंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्पष्ट केले.

माहिती-तंत्रज्ञान कायद्यातील नवे नियम देशात कार्यरत असणाऱ्या समाजमाध्यम कंपन्यांसाठी २६ मेपासून लागू करण्यात आले असून ट्विटरवगळता अन्य कंपन्या या नियमांचे पालन करत आहेत. प्रत्येक सोशल मीडिया कंपनीला ग्राहक तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. पण, या अधिकाऱ्याची नेमणूक ‘ट्विटर’ने अजूनही केलेली नाही. या मुद्द्यावरून तत्कालिन केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी ‘ट्विटर’ विरोधात आघाडी उघडली होती. देशातील नियमांचे पालन ‘ट्विटर’ला करावेच लागेल, असा इशारा प्रसाद यांनी दिला होता. नवे माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही प्रसाद यांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे.