राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी; संजय राऊत यांची प्रतिक्रिया


मुंबई – काल अखेर नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला असून या मंत्रिमंडळात नारायण राणे यांची वर्णी लागली आहे. नारायण राणेंकडे मोदींच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या शपथविधीत सर्वात प्रथम नारायण राणे यांनी शपथ घेतली. दरम्यान केंद्रात नारायण राणे यांना स्थान दिल्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. यावर शिवसेनेनेही प्रतिक्रिया दिली असून राणेंची उंची दिलेल्या जबाबदारीपेक्षा मोठी असल्याचे म्हटले आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संवाद साधला. नारायण राणे यांना मंत्री केले आहे. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिले आहे. नारायण राणे यांची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री होते, अनेक पदे त्यांनी सांभाळली असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच नारायण राणेंसमोर महाराष्ट्र आणि देशात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करण्याचे तसेच कोरोना काळात कोलमडलेल्या उद्योगांना संजीवनी देण्याचे आव्हान असल्याचेही ते म्हणाले आहेत.

राणेंना मंत्रीपद शिवसेनेला फटका बसण्यासाठी दिले असेल, तर तो मोदींच्या कॅबिनेटचा अपमान आहे. देशाचे काम करण्यासाठी त्यांना मंत्रीपद दिले जाते. शिवसेना, राष्ट्रवादीला फटका देण्यासाठी किंवा जे राजकीय विरोधक आहे त्यांना फटका देण्यासाठी मंत्रीपद दिली असतील, तर हे घटनाविरोधी आहे. असे असेल तर त्यांना कळवायला सांगा की, त्यांना देशाची सेवा करण्याऐवजी या कामासाठी मंत्रीपद दिले आहे. पण असे वाटत असेल ते चुकीचे आहे. मंत्रीपद राज्याचे आणि देशाचे असते, जे विकास आणि लोकांची कामे करण्यासाठी असतात, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

मोदींनी मंत्रिमंडळाचे पत्ते पिसले असून महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रीपदे आली आहेत. पण प्रकाश जावडेकरांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ मोहरा पडलेला असल्याचेही यावेळी ते म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे भाजपने आभार मानले पाहिजेत. जो आमच्याकडून पुरवठा झाला आहे, त्यामुळेच महाराष्ट्रातून मंत्रिमंडळात चेहरे मिळाले आहेत. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचे प्रॉडक्ट आहे. भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचे प्रॉडक्शन आहे. नारायण राणे हे शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले आहेत. मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना राष्ट्रवादीचाच असल्याचा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

केंद्रात पाहिले तर अनेक जुने जाणते बाजूला आहेत आणि बाहेरुन आलेल्या अनेकांना जबाबदाऱ्या दिल्या आहेत. सक्षमता पाहून दिले असावा असे मी मानतो, असेही यावेळी ते म्हणाले. देशाचा कारभार त्यांनी सांभाळायचा आहे. आर्थिक, महागाई, आरोग्यविषय आणीबाणी, बेरोजगारी या सगळ्या संदर्भात महाराष्ट्रातील मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. नवीम मंत्र्यांना शुभेच्छा आहेत. महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदाना द्यावे, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.