मोदींचा नव्या मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत प्रसारमाध्यमांशी जास्त न बोलण्याचा सल्ला


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात बुधवारी ४३ मंत्र्यांनी शपथ घेतली. या पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ विस्तारानंतर आजपासूनच नवीन मंत्र्यांसोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मोदींनी मंत्रिमंडळातील नवीन सहकाऱ्यांना पहिल्याच दिवशी काही सल्ले दिले आहेत. मोदींनी यामध्ये प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका, असेही सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी शपथ घेतलेल्या ४३ मंत्र्यांपैकी ३६ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात १५ कॅबिनेट मंत्री, तर २८ राज्यमंत्री आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळातील पहिले सहकारमंत्रीपद अमित शहा यांच्याकडे देण्यात आले असून, त्यांच्याकडील गृहमंत्रीपदाची जबाबदारीही कायम ठेवण्यात आली आहे. गुजरातचे मनसुख मंडाविया हे नवे आरोग्यमंत्री असतील तर, माजी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान नवे शिक्षण मंत्री आहेत. कालच्या शपथविधीनंतर आज लगेचच मोदी २.० टीमने आपले काम सुरु केले. पंतप्रधान मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासहीत आज देशातील वेगवेगळ्या आयआयटीच्या संचालकांशी चर्चा केली.

जवळपास सर्वच नवीन मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला असून या सर्वांना मोदींनी सूचना करताना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीमध्ये थांबून आपल्या मंत्रालयाचे काम समजून घ्यावे, असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पदभार स्वीकारल्याच्या दिवशीच मंत्रालयाचे कामकाज लवकर सुरु करावे अशा सुचना नवीन सहकाऱ्यांना मोदींनी दिल्या आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमांशी जास्त बोलू नका, असा सल्लाही या नवीन मंत्र्यांना मोदींनी दिल्याचे समजते.

मोदींच्या नव्या मंत्रिमंडळ रचनेत आता ७७ मंत्री आहेत. त्यातील ७३ भाजप व उर्वरित ४ मंत्री अपना दल, जनता दल (सं), लोक जनशक्ती व रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत. मोदींचे नवे मंत्रिमंडळ पूर्वीच्या तुलनेत अधिक तरुण असून महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, जाट, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशला सर्वाधिक ७ तर, महाराष्ट्राला ४ नवी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात २५ राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.

सहा केंद्रीय मंत्र्यांसह १२ मंत्र्यांना वगळण्यात आले असले तरी, संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्र खात्यांच्या प्रमुख चार मंत्र्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरोग्य, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान, माहिती-प्रसारण, विधि, सामाजिक न्याय, रसायने व खते, नागरी पुरवठा, अवजड उद्योग, दूरसंचार, पर्यावरण, कामगार कल्याण अशा किमान १२ मंत्रालयांसाठी नवे केंद्रीय तसेच, राज्यमंत्री नियुक्त केले जातील.