संचारबंदीपूर्वी पंढरपुरात दाखल झालेल्या भाविकांना बाहेर काढणार : पोलीस अधिक्षक


पंढरपूर : यंदाही 17जुलैपासून 24 जुलै पर्यंत आषाढी यात्रा काळात 9 दिवस संचारबंदी लागू केली असताना त्यापूर्वीच काही भाविक पंढरपूरमधील विविध मठात येऊन दाखल होण्यास सुरुवात झाल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता अशा भाविकांना बाहेर घालवण्यासाठी सर्व मठ आणि धर्मशाळांना पोलिसांनी नोटीस बजावल्या असून तपासणीमध्ये जे भाविक पंढरपूरमध्ये आषाढीसाठी वास्तव्याला आलेले असतील त्यांना पोलीस शहराबाहेर पाठवून देणार आहेत.

राज्य सरकारने आषाढीसाठी मानाच्या 10 पालखी सोहळ्यातील 400 भाविक आणि 195 मठाधिपती यांना शहरात थांबण्याची परवानगी दिलेली आहे. त्यांना वगळता जे भाविक आषाढीपूर्वी दाखल झाले आहेत, त्यांना बाहेर काढण्यात येणार असल्याचे पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले. पंढरपूरमध्ये अद्यापही कोरोनाचे संकट संपलेले नसल्यामुळे भाविकांच्या आरोग्यासाठी हे पाऊल उचलले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आषाढी यात्रेसाठी चंद्रभागा स्नानालाही बंदी घालण्यात आलेली असल्यामुळे ज्यांना परवानगी दिलेली आहे असेच भाविक चंद्रभागेपर्यंत पोचू शकणार आहेत. सोलापूर जिल्ह्यापासून पंढरपूर शहरापर्यंत त्रिस्तरीय नाकेबंदी करण्यात येणार असल्यामुळे परवानगी नसलेल्या एकही भाविकाला सोलापूर जिल्हा हद्दीत प्रवेश करता येणार नाही.

आषाढी बंदोबस्तासाठी येणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचारी हे शक्यतो दोन लस घेतलेले असावेत अशी तयारी केली असून प्रत्येकाची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचेही पोलीस अधिक्षक सातपुते यांनी सांगितले. तसेच बंदोबस्ताला येणाऱ्या प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्याला कोरोना किट दिले जाणार असून कोरोनाच्या दृष्टीने सर्व तयारी केल्याचे त्यांनी सांगितले. आषाढीसाठी मुख्यमंत्री महापूजेला येणार असल्यामुळे मंदिरात पूजेच्यावेळी कमीत कमी उपस्थितीबाबत प्रस्ताव शासनाला दिल्याचेही सातपुते यांनी सांगितले.

कोरोना काळात सलग दुसऱ्या वर्षीही होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली असून पंढरपूर शहरासह शेजारच्या 10 गावात 17 जुलैपासून 25 जुलैपर्यंत संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. या संपूर्ण 9 दिवसाच्या कालावधीत पंढरपूर डेपोमधील एसटी बस सेवेसह सर्व खाजगी वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आषाढ शुद्ध अष्टमी अर्थात 17 जुलैच्या दुपारी 2 वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात होणार असून हे संचारबंदी 25 जुलै म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दुपारी चार वाजेपर्यंत राहणार आहे. पंढरपूर शहरासह शेजारील वाखरी, भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, कोर्टी , गादेगाव, शिरढोण आणि कौठाळी या दहा गावात या नऊ दिवसात काटेकोरपणे संचारबंदीचे अवलंब केले जाणार आहेत.