अमित शहा यांच्याकडे सहकार विभागाची जबाबदारी; राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत


मुंबई – केंद्रीय मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार बुधवारी पार पडल्यानंतर ४३ मंत्र्यांचा नव्याने समावेश करण्यात आला. पण, एका नवीन खात्याचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला. देशातील सहकार चळवळीला अधिक गती देण्याच्या उद्देशाने केंद्रात सहकार विभाग हे नवीन खाते तयार करण्यात आले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्याचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. पण, त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या ताब्यात असणाऱ्या सहकार साम्राज्याला नियंत्रणात आणलं जाईल, असे देखील बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर अमित शहा यांच्या सहकार मंत्रिपदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले आहे. पण, त्यासोबतच त्यांनी अमित शहा यांच्याकडून विशिष्ट अपेक्षा देखील व्यक्त केली आहे. अमित शहा यांच्या मंत्रिपदासाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा देताना अप्रत्यक्षपणे खोचक टोला देखील लगावला आहे. सहकार गुजरात आणि महाराष्ट्रातच आहे. अमित शहा गुजरातमध्ये एक बँकही चालवत होते. नोटबंदीच्या काळात त्यांच्या एका बँकेचे नाव फार चर्चेत आले होते. त्या बँकेत जास्त नोटा एक्सचेंज झाल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे सहकाराचा त्यांना अनुभव असल्याचे ते म्हणाले.

जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना अमित शहा यांना आवाहन केले आहे. गुजरात आणि महाराष्ट्राचा सहकार यात फारसा फरक नाही. अमित शहा यांच्या नेमणुकीमुळे देशात सहकार चळवळ वाढायला मदत होईल. त्यांच्या नेमणुकीचे मी स्वागतच करतो. पण, त्याचसोबत रिझर्व्ह बँक नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर बंधने घालते, त्यांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. त्यांना अमित शहा सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे. देशातील बँकिंग व्यवसायावर अन्याय होत असल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.

दरम्यान ईडीने भोसरी येथील जमीन व्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी बोलावले असून त्यांची चौकशी केली जात आहे. पण, हे सगळे ईडीचे कुभांड असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे. ज्या प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली आहे, त्यात अद्याप काहीही तथ्य आढळलेले नाही. त्यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. व्यवहार कायदेशीररीत्या झाले आहेत. कोणत्याही चौकशी समितीला त्यात काही आढळले नाही.

पण या एजन्सी कुभांड रचून त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ खडसेंवरचा भाजपचा राग फार जुना आहे. त्यांना त्यांच्या पक्षातही फार वाढू दिले नाही. ओबीसी नेतृत्वाला बाजूला करण्याचे काम त्या पक्षाने केले. त्यांना सन्मानाने आम्ही पक्षात प्रवेश दिला. आज त्यांनी चिडून जाऊन एकनाथ खडसेंना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याचे काम केले आहे. हे सर्व मुद्दाम केले जात आहे. या सगळ्यातून एकनाथ खडसे लवकरच बाहेर येतील, असे जयंत पाटील यावेळी म्हणाले.