वडीलांच्या शपथविधीनंतर राणे बंधूंची पहिली प्रतिक्रिया


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळातील नवीन सदस्यांचा राष्ट्रपती भवनात शपथविधी पार पडत आहे. या मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्यांच्या यादीत पहिला मान हा महाराष्ट्राला नारायण राणे यांच्या रुपाने मिळाला. हिंदी भाषेत नारायण राणे यांनी शपथ घेतली. तर, त्यांचा शपथविधी होताच त्यांचे पुत्र निलेश राणे व आमदार नितेश राणे यांनी माध्यमांनी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या.

आज दिवस हा चांगला दिवस आहे. नारायण राणे यांच्यावर पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोठी जबाबदारी टाकली आहे. जेव्हा जेव्हा नारायण राणे यांच्यावर जबाबदारी आली, त्या जबाबदारीला १०० टक्के न्याय देण्याचे काम त्यांनी नेहमीच केले आहे. माझी खात्री आहे यावेळेसही तसेच होईल, अशी पहिली प्रतिक्रिया निलेश राणे यांनी दिली.

तर, सर्वात प्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे राणे कुटुंबीयांच्यावतीने मी मनापासून आभार मानतो. राणे कुटुंबीयांसाठी आज निश्चितपणे सुवर्णक्षण आहे, पण त्याच बरोबर भाजपचा एक कार्यकर्ता म्हणून आमच्या सगळ्यांसाठी देखील महत्वाचा क्षण आहे, हे मला या निमित्त सांगायचे आहे, अशा शब्दांमध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी भावना व्यक्त केल्या.

तसेच, मी आपल्याला जसे अगोदर सांगितले. मुख्यमंत्री होतानाही नारायण राणे अचानकच झाले होते. तेव्हाही बाळासाहेब ठाकरे यांनी काही पूर्वकल्पना देऊन त्यांना मुख्यमंत्री केले नव्हते. आजपर्यंत अनेक अधिकारी कार्यकर्ते हे तेव्हाचा काळ आठवतात. नारायण राणेंची काम करण्याची पद्धतच तशी राहिलेली आहे. जबाबदारी गंभीरपणे घेणे आणि ही देशाची सेवा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी प्रत्येक पदाला फार गंभीरपणे घेतले आणि आताही तसेच होईल. यासाठी काही वेगळे सांगायची गरज नाही. त्यांना पंतप्रधान मोदींनी जी जबाबदारी दिली आहे. ते ती चोखपणे बजावतील, यामध्ये शंका नसल्याचे देखील निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.