देशात काल दिवसभरात 43,733 कोरोनाबाधितांची नोंद


नवी दिल्ली – जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव देशात घटताना दिसून येत असला तरी अद्याप धोका टळलेला नाही. देशात गेल्या काही दिवसांपासून 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत होती. पण, आज दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा काहीसा वाढलेला दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 43 हजार 733 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच गेल्या 24 तासांत 47,240 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 97.18 टक्क्यांवर पोहोचला आहे.

आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात काल कोरोनामुळे 930 रुग्णांनी जीव गमावला आहे. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुळे 4 लाख 4 हजार 211 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, काल भारतात कोरोनासाठी 19 लाख 7 हजार 216 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 42 कोटी 33 लाख 32 हजार 97 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात दैनंदिन कोरोना बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काही दिवसांपासून रोज 9 हजारांच्या आसपास दैनंदिन रुग्ण वाढत आहेत. अशात काल 8, 418 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 10 हजार 548 जण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 58 लाख 72 हजार 268 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.06 टक्के आहे.

राज्यात काल 171 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.02 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 14 हजार 297 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (50), हिंगोली (84), गोंदिया (89) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,524 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

भंडारा जिल्ह्यात काल शून्य रुग्ण आढळले आहेत. तर कोल्हापुरात सर्वाधिक 1328 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,29,08,288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 61,13, 335(14.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,38,832 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,487 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना नियंत्रणात असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 453 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 482 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6,99,823 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 7,908 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 822 दिवसांवर गेला आहे.