आयसीएमआरचा निष्कर्ष; दोन्ही डोस घेतल्यास मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी


नवी दिल्ली – सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने देशात चांगलाच वेग घेतला आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. भारतीय संशोधन अनुसंधान संस्था अर्थात आयसीएमआऱच्या एका अभ्यासातून हे समोर आले आहे की, कोरोना प्रतिबंधक लसीचे जर दोन्ही डोस घेतले असतील, तर मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यत कमी होतो.

हा अभ्यास तमिळनाडूच्या पोलीस दलातील एक लाख १७ हजार ५२४ जवानांच्या आधारे करण्यात आला. या अभ्यासादरम्यान लस घेतलेले जवान आणि लस न घेतलेले जवान यांच्यापैकी किती जणांचा कोरोनाने मृत्यू झाला याबद्दल निरीक्षण करण्यात आले.

हा अभ्यास १ फेब्रुवारी २०२१ ते १४ मे २०२१ या कालावधीत करण्यात आला. या अभ्यासासाठी लसीचा एक डोस घेतलेले ३२ हजार ७९२ कर्मचारी निवडण्यात आले. लसींचे दोन्ही डोस घेतलेले ६७,६७३ कर्मचारी होते, तर १७, ०५९ पोलीस कर्मचाऱ्यांनी लस घेतली नव्हती. या अभ्यासानुसार, १३ एप्रिल २०२१ ते १४ मे २०२१ या दरम्यान ३१ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यापैकी ४ जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले होते, तर ७ जणांनी एकच डोस घेतला होता. बाकीच्या २० जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती.

या अभ्यासातून समोर आले आहे की, प्रतिबंधक लस कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रभावी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतला होता, त्यांना मृत्यूचा धोका ८२ टक्क्यांपर्यंत कमी होता, तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी असल्याचे आढळून आले. तसेच ज्यांनी लस घेतली नाही त्यांच्या तुलनेत लस घेतलेल्या लोकांना मृत्यूचा धोका फारच कमी आहे. पहिला डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका ०.१८ टक्के होता तर दोन्ही डोस घेतलेल्यांना हा धोका ०.०५ टक्के होता.