राजेश साप्तेंच्या मारेकऱ्यांपर्यंत पोहचायचे असेल तर राम कदम यांना ताबडतोब अटक करा – विद्या चव्हाण


मुंबई: भाजप आमदार राम कदम यांच्या नेतृत्वाखाली जे गुंडाराज गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे सुरू आहे, त्यांनीच कला दिग्दर्शक राजेश साप्ते यांचा बळी घेतला असून राजेश साप्ते यांच्या खऱ्या मारेकऱ्यांपर्यंत पोहचायचे असेल तर राम कदम यांना ताबडतोब अटक केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केली आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन राजेश साप्ते आत्महत्या प्रकरणात राम कदम यांच्यावर विद्या चव्हाण यांनी अनेक गंभीर आरोप केले. चव्हाण यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगत गोरेगावच्या चित्रनगरीत कशाप्रकारे गुंडाराज सुरू असल्याचे दाखले दिले आहेत. दोन दिवसांपूर्वी कलादिग्दर्शक राजेश साप्ते यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आत्महत्येपूर्वी राजेश साप्ते यांनी सुसाइड नोटमध्ये ज्यांची नावे लिहिली आहेत, त्यांनी गेली अनेक वर्षे सुमारे ४५ हजारांवर कामगारांना वेठीस धरले आहे.

कोरोनाच्या काळात लागू असलेल्या लॉकडाऊन काळात सलमान खान, यशराज फिल्म्स आणि इतर काही निर्मिती संस्थांनी कामगारांसाठी ५० कोटी रुपये मदत म्हणून दिले होते. पण संबंधित युनियनने त्यातील २ कोटी देखील गरीब कामगारांना मिळू दिले नाहीत. गोरेगावची संपूर्ण चित्रनगरी या लोकांनी काबीज केली असून तिथे गुंडाराज चालले आहे. भाजप आमदार राम कदम या सर्वांचे नेतृत्व करत असून त्यांना ताबडतोब अटक झाली तरच खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहचता येईल, असे चव्हाण म्हणाल्या.

ही युनियन नृत्य, अॅक्शन, म्युझिक अशा विविध क्राफ्टची आहे. या युनियनचे २०१५ मध्ये राम कदम चेअरमन झाले. तेव्हापासून राकेश मौर्या, गंगेश्वर श्रीवास्तव, अम्रिश श्रीवास्तव, अशोक दुबे, बी.एन. तिवारी, दीपक श्रीवास्तव यांची गोरेगाव चित्रनगरी येथे दादागिरी सुरू झाली आहे. वेळोवेळी आपले राजकीय वजन वापरून राम कदम यांनी या गुंडांना वाचवले आहे. या सर्वांचे कायदेशीर सल्लागार हे किरीट सोमय्या असून या गुंडांची गुन्ह्याची प्रकरणे दाबून टाकण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात गृहखात्याचा गैरवापर केला गेल्याचा गंभीर आरोपही विद्या चव्हाण यांनी केला.

माझा आता या युनियनशी काहीही संबंध नसल्याचे राम कदम सांगत असले तरी चित्रनगरीतील गुंडांना कदम यांचेच पाठबळ असून साप्ते यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या गुन्हेगारांपर्यंत पोहचायचे असेल तर राम कदम यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. राजेश साप्ते यांनी आत्महत्येपूर्वी माझे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, असे लिहिले आहे. ही बाब मन हेलावून टाकणारी असून चित्रनगरीतील गुंडाराज संपवण्यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.