माझ्यामुळे जे त्रस्त आहेत, तेच अशा प्रकारच्या अफवा पसरवतात – संजय राऊत


मुंबई – सध्या राज्यातील राजकीय वर्तुळात शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप आमदार आशिष शेलार यांची भेट झाल्याची चर्चा सुरू होती. पण, ही चर्चा खुद्द संजय राऊत यांनी फेटाळून लावली आहे. आमची अशी कोणतीही भेट झालेली नाही आणि जरी भेट झाली असली, तरी त्यात गैर काय? महाराष्ट्राचे किंवा देशाचे राजकारण हिंदुस्थान-पाकिस्तानसारखे नाही. पण ज्यांना माझ्यामुळे त्रास होतो, माझ्या लिहिण्या-बोलण्यामुळे त्रास होतो, अशा लोकांकडून अशा अफवा पसरवल्या जातात, मी त्यांचं स्वागतच करतो, असा खोचक टोला संजय राऊत यांनी विरोधकांना लगावला आहे.

संजय राऊत यांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. तसेच, उद्यापासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनातील सरकारच्या धोरणाविषयी देखील त्यांनी मत मांडले. दरम्यान, संजय राऊत यांनी यावेळी अशी भेट झाली जरी असेल, तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? असा सवाल केला. महाराष्ट्रात दोन वेगवेगळ्या पक्षाचे नेते भेटले, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय? पण मुळात अशा पद्धतीची भेट झालेलीच नाही. मी कामात होतो. पण तरी अफवा पसरवण्यात आल्या. पण अशा अफवांमुळे राजकारण हलते का? अस्थिर होते का? अजिबात नाही. महाराष्ट्राच्या सरकारला काही अडचणी निर्माण होतील का? अजिबात नाही. उलट अशा अफवा पसरवल्यामुळे आमचे तीन पक्षांचे नेते मोठ्या प्रमाणावर एकत्र येतात. त्यामुळे अशा अफवा पसरवण्याचे हे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील, असे राऊत म्हणाले.

माझी कुणाशीही भेट झालेली नाही. आशिष शेलार खूप आधी एका सार्वजनिक कार्यक्रमात भेटले होते. आम्ही तेव्हा कॉफी देखील प्यायलो होतो. महाराष्ट्रातील राजकारण हिंदुस्तान-पाकिस्तानसारखे नाही की गोळ्या घाला आणि संपवा. या प्रकारे अफवा पसरवल्यामुळे काहीही होणार नाही. विधानसभेचे अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्याआधी अफवा पसरवल्या जात आहेत. ज्यांना माझ्यामुळे त्रास होतो, माझ्या बोलण्यामुळे, माझ्या लिहिण्यामुळे, ते माझ्याबद्दल अशा अफवा पसरवतात. मी अशा अफवांचे स्वागत करतो, असा टोला राऊत यांनी लगावला.