त्यावेळी फडणवीसांनी माझे ऐकले असते, तर ते आज मुख्यमंत्री असते; रामदास आठवले


मुंबई: भाजपला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना विरोधकांच्या बाकावर बसायला लागल्यानंतर भाजपने पुन्हा एका आक्रमक होत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर अनेकविध विषयांवर हल्लाबोल सुरू केला. त्याचबरोबर राजकीय वर्तुळात ठाकरे सरकार पडेल, अशी चर्चाही रंगली होती. पण, आता पुन्हा शिवसेनेशी झालेला काडीमोड आणि त्यानंतरच्या राजकारणावरून केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून, तेव्हा फडणवीसांनी माझे ऐकले असते, तर ते आज मुख्यमंत्री असते, असे म्हटले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ‘सन्मान देवदूतांचा’ या कार्यक्रमात बोलताना शिवसेना-भाजप युती आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद यांवर मिश्किल भाष्य केले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले, असे सांगितले जात आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले या कार्यक्रमाला उपस्थित होते.

शिवसेना-भाजपची मुख्यमंत्रिपदावरुन ताटातूट झाली आणि पुढे जाऊन सेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आपला नवा संसार थाटला. देवेंद्र फडणवीस यांना सत्तासंघर्षाच्या याच काळात शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा सल्ला दिला होता. माझे जर ते म्हणणे फडणवीसांनी ऐकले असते, तर ते आज मुख्यमंत्री असते, असे सांगत, तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल, तर मला मुख्यमंत्री करा, असेही त्यावेळी सांगितले होते, असे रामदास आठवले म्हणाले.

दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना संकटकाळात उत्तम काम केले. त्यांनी घरातील सदस्यांप्रमाणे राज्यातील जनतेची काळजी घेतली. विरोधक भाजपनेही टोपे यांच्यावर कधी टीका केली नाही, असे सांगत आठवले यांनी राजेश टोपे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.