कंगना राणावतचा दावा न्यायालयाची दिशाभूल करणारा; जावेद अख्तर यांच्यावतीने हस्तक्षेप याचिका दाखल


मुंबई : आता गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगना राणावतविरोधात मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. जाणीवपूर्वक सत्य कंगनाने माहिती न्यायालयापासून लपवून न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला आहे.

पासपोर्ट नूतनीकरण करण्यासाठी कंगनाने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान तिच्या विरोधात न्यायालयात एकही फौजदारी खटला प्रलंबित नसल्याचे विधान तिच्यावतीने तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी केले आहे. पण हे विधान खोटे आणि न्यायालयाची दिशाभूल करणारे असल्याचा आरोप जावेद अख्तर यांनी केला आहे.

कंगनाविरोधात दंडाधिकारी न्यायालयात जावेद अख्तर यांनी मानहानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे. ज्यात न्यायालयाने तिच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही बजावले होते. त्यामुळे कंगनाच्या वकिलांनी केवळ दोन फौजदारी तक्रारींची माहिती न्यायालयात दिली आणि अख्तर यांनी केलेल्या खटल्याची माहिती दडवून ठेवली, असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.

या खटल्याची माहिती कंगनाला आहे आणि तिने त्याबद्दल न्यायालयात सांगायला हवे होते, असेही अख्तर यांनी म्हटले आहे. आपल्याविरोधात केवळ देशद्रोह आणि कॉपीराईट याच प्रकरणात तक्रारीची नोंद आहे, या विधानाची नोंद घेत उच्च न्यायालयाने तिच्या पासपोर्ट नूतनीकरणबाबत शक्य तितक्या जलदीने निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने पारपत्र विभागाला दिले आहेत. मात्र कंगनाने न्यायालयात खोटे आणि दिशाभूल करत स्वतःचा फायदा करण्यासाठीच विधान केल्याचा जावेद अख्तर यांचा आरोप आहे.

जावेद अख्तर यांनी दिंडोशी सत्र न्यायालयात कंगनाविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अख्तर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत हा खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कंगनानं न्यायालयापुढे हजेरी लावत आपल्याविरोधातील वॉरंट रद्द करून घेतले आहे.