काल दिवसभरात 40 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद; तर 907 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्याचबरोबर देशातील लसीकरण मोहीमेलाही आता बऱ्यापैकी वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 37,566 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात झाली असून 907 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 102 दिवसांनी देशात चाळीस हजारांहून कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. याचसोबतच देशाचा रिकव्हरी रेट 96.87% वर पोहोचला आहे.

देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन 5,52,659 पोहोचली आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 3,97,637 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचा रिकव्हरी रेट वाढून 96.87% टक्क्यांवर पोहोचला आहे. तसेच रविवारी देशात 52 लाख 76 हजार लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्र मागील दोन दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या काहीशी वाढली होती. पण काल (सोमवारी) राज्यात रविवारच्या तुलनेत रुग्णसंख्या तीन हजारने कमी झाली आहे. राज्यात काल 6727 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 812 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 925 रुणांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 95.99 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 864 अॅक्टिव रुग्ण आहेत.

राज्यात काल दिवसभरात 101 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढाआहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,12,08,361 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60,43,548 (14.65 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6,15,836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 4,245 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांपैकी यवतमाळमध्ये सर्वात कमी 86 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 17 हजार 42 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे एकूण 35 जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात एकही मृत्यूची नोंद नाही. तर वर्धा जिल्हात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.

गेल्या 24 तासात मुंबईत 608 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 714 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 94 हजार 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर गेल्या 24 तासात मुंबईत 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 8453 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 728 दिवसांवर गेला आहे.