मी देवेंद्र फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही -संजय राऊत


मुंबई – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने पुकारलेल्या चक्का जाम आंदोलनादरम्यान तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं नाही, तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना मी त्यांची भेट घेईन, मी फडणवीसांना संन्यास घेऊ देणार नाही, असे संजय राऊत म्हणाले. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने भाष्य केल्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही यावर भूमिका मांडली. फकीर होण्याची भाषा फडणवीसांनी करणे योग्य नसल्याचेही ते बोलताना म्हणाले.

देशात, राज्यात फार कमी चांगली नेतृत्व आहेत. त्यापैकी फडणवीस एक असल्यामुळे त्यांनी संन्यास घेतला तर भारतीय जनता पार्टीचे तसेच जनतेचेही मोठे नुकसान होईल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण पुर्नप्रस्थापित करण्यात यावे यासाठी राज्यभर चक्का जाम आंदोलनही करण्यात आले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच आंदोलनाच्या दरम्यान ठाकरे सरकारवर टीकेची तोफ डागली होती. त्याचबरोबर सत्ता द्या तीन महिन्यांत ओबीसींना आरक्षण देईन; नाहीतर राजकारणातून कायमचा संन्यास घेईन, असा दावाही केला. शिवसेनेने फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यासाच्या दाव्याचा समाचार घेतला आहे. आज भाजप बावनकुळेंचे कौतुक करीत आहे, पण ओबीसींचे नेते बावनकुळे यांच्या आमदारकीचे तिकीट कापून ‘ओबीसी’ नेतृत्वाचे पंख कापणारे हात कोणाचे होते, हेसुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला कळूद्या!, असा टोलाही शिवसेनेने भाजपला लगावला होता.

तर राऊतांनी आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखामधूनही फडणवीसांवर खोचक टीका केली आहे. आज रस्त्यांवर गर्दी जमवून आदळआपट करून काय साध्य करणार? भाजप व त्यांचे पुढारी विद्वान आहेत, कायदेबाज असल्यामुळे सरकारच्याच बरोबरीने ओबीसी आरक्षणाची लढाई त्यांनी सुरूच ठेवावी व ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यास हातभार लावावा. मराठा आणि ओबीसी आरक्षणाची आम्हाला चिंता आहेच, पण फडणवीस यांनी केलेल्या राजकीय संन्यास घेण्याच्या घोषणेची देखील आहे. फडणवीसांनी असा त्रागा करून घेऊ नये. सर्वकाही सुरळीत व त्यांच्या मनाप्रमाणे होईल. संन्यास घेतील त्यांचे दुष्मन!, अशा शब्दात शिवसेनेने फडणवीसांना चिमटे काढले आहेत.