शासनाबरोबरच स्वयंसेवी संस्थाच्याही व्यसनमुक्ती उपक्रमात जनतेचे सहकार्य हवे – धनंजय मुंडे


मुंबई : शासनाने अंमली पदार्थावर बंदी घातलेली आहे. सार्वजनिक आरोग्य व जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी घटनेत व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले आहे. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवला पाहिजे, कोणत्याही अंमली पदार्थाच्या अमिषाला तरूण पिढी बळी पडू नये यासाठी सर्वांनी सजग रहावे प्रशासनाला व व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना सहकार्य करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन वेबिनारमध्ये त्यांनी हा संदेश दिला.

२६ जून जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्याने सामाजिक न्याय विभाग, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबई शहर जिल्हाधिकारी, समाजकल्याण विभाग, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सलाम मुंबई फाऊंडेशन, मुंबईत व्यसनमुक्तीवर कार्यरत असणाऱ्या संस्था, संघटना, अखिल भारतीय नशामुक्त अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने नशामुक्त भारत अभियान अंतर्गत याचे आयोजन करण्यात आले होते.

श्री.मुंडे मार्गदर्शन करताना म्हणाले, राज्यघटनेतील अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य व आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त मादक पदार्थांवरील बंदीची धोरण निश्चित करण्यात आली आहेत.जागतिक अंमली पदार्थविरोधी दिनानिमित्त आयोजित वेबिनारमधून विचारमंथन घडेल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

स्थापक नियंत्रण कक्षाचे क्षेत्रीय निदेशक समीर वानखेडे यांनी अमली पदार्थ प्रकार, NDPS कायदा बद्दल माहिती दिली. तसेच पालकांनी मुलांशी संवाद साधत राहून त्यांच्यावर लक्ष ठेवले पाहिजे हे सांगितले. महाराष्ट्र शासन अंमली पदार्थाच्या विरोधात असून भारतीय राज्यघटनेतील कलम ४७ अनुच्छेद नुसार औषधांखेरीज अंमली पदार्थांचा वापर होणार नाही, यासाठी कटिबद्ध आहे. पालकांनीही याबाबतीत सतर्क राहून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे.तसेच व्यसनमुक्तीच्या राष्ट्रीय लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले,

अंमली पदार्थांचे दुष्परिणाम यांची माहिती दिली. अंमली पदार्थ आणि राष्ट्रीय हानी याचा संबंध जोडून अंमली पदार्थांचा देशद्रोहासाठी होणारा आणि त्यासाठी युवकांचा होणारा वापर, पैशांच्या मोहामुळे त्यात अडकत जाणारी युवापिढी हे देशासमोरील आव्हान असल्याचे सांगत आपण सर्वांनी याबाबत सतर्क राहून अशा प्रकारची माहिती आढळल्यास तात्काळ नार्कोटिक्स कंट्रोल विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन केले.

पोस्टर्स व गीताचे विमोचन
अंमली पदार्थाची माहिती प्रशासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक असलेले पोस्टर्स व Say No To Drugs या गिताचे विमोचन यावेळी समीर वानखेडे व मुंबई शहर चे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते करण्यात आले.

जनजागृती आवश्यक-राजीव निवतकर
मुंबई शहर चे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी वेबिनार मध्ये अंमली पदार्थाच्या विरोधातील या लढ्यात उस्फुर्तपणे सहभागी झालेल्या शाळा, महाविद्यालयीन युवकांचे स्वागत करत अंमली पदार्थाचा ईतिहास, या गोष्टींचा अवैध कामासाठी होणारा वापर या सर्वांवर प्रकाश टाकला. त्यात अडकत जाणारी युवा पिढी वाचविण्याच्या दृष्टीने अंमलात असलेले कायदे, त्यांच्या प्रचारासाठी आवश्यक म्हणुन शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रे अशा ठिकाणी अंमली पदार्थावरील दुष्परिणाम व कायदे यांची माहिती देऊन जनजागृती करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

सेलिब्रेटींचे मनोगत
अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त सामाजिक जाणीव संदेश म्हणून अक्षय कुमार, जॉन अब्राहम, शंकर महादेवन, माधुरी दिक्षित, सोनु सुद, क्रांती रेडकर, सुर्यकुमार यादव व व्यसनमुक्तीचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर सिद्धार्थ जाधव यांनी अंमली पदार्थाच्या विरोधी लढ्यात आपला सहभाग म्हणून Say No To Drugs म्हणत आपले मनोगत व्हिडिओच्या माध्यमातून पाठवले होते. ते वेबिनार मध्ये दाखविण्यात आले.

अंमली पदार्थ पालक, समाज, प्रशासन यांच्या भूमिकेतून विषय मांडताना व्यसनाची सुरुवात साधारणपणे तंबाखू पासुन होताना दिसते आणि नशेचे प्रमाण वाढविण्यासाठी दारु व त्यानंतर मद्यधुंद होण्यासाठी अंमली पदार्थाकडे आपसुकच पावले वळतात. अशावेळी काही क्षणांसाठी केलेली नशा ही आयुष्य भराची सजा भोगायला लागते. कारण अमली पदार्थाचे सेवन केले नाही तर व्यक्ती स्वतःवरचे नियंत्रण सुटल्यामुळे कोणत्याही प्रकारची क्रिया करते त्यामुळेच सामाजिक वातावरण खराब होऊन समाजाची हानी करतात.

अशावेळी पालक म्हणून मुलांसमवेत आपला नियमित संवाद साधणे, त्यांचा मित्र परिवार, भेटीगाठी यावर लक्ष ठेवून त्यांना अंमली पदार्थाच्या दुष्परिणामांची माहिती देऊन दूर ठेवण्यासाठी आग्रही रहायले हवे. तसेच सामाजिक वातावरणात अंमली पदार्थाना प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही असे वातावरण निर्मिती करुन प्रशासकीय यंत्रणे समवेत अशा स्वरुपाचे प्रकार चालू असल्यास त्यावर बंदी आणण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा उभारुन कार्यरत राहिले पाहिजे असे मत या चर्चासत्रांत नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य चे चिटणीस अमोल मडामे व सलाम बॉम्बे फाऊंडेशन चे असिस्टंट जनरल मँनेजर दिपक पाटील यांनी मांडले.

मानसोपचार तज्‍ज्ञ आणि व्यसनमुक्ती समुपदेशक डॉ.सागर.मुंदडा यांनी व्यसनी रुणावरील उपचार पद्धती, मानसिक आजाराबद्दल मार्गदर्शन केले. समीर वानखेडे यांनी उपस्थितांना अंमली पदार्थापासुन स्वतः परावृत्त राहुन इतरांना परावृत्त करण्यासाठी अंमली पदार्थाच्या विरोधातील शपथ दिली. वेबीनार मधे अनेक जण say no to Drugs चे.मास घालून सर्वांना संदेश देत होते.

कार्यक्रमाच्या आयोजनांत सहभागी असणाऱ्या संस्था, संघटना, मान्यवर, समुपदेशक, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी,आदि सर्वांचे आभार समाधान इंगळे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर यांनी मानले. तर वेबिनारचे संचालन नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास व सलाम बाँम्बे फाऊंडेशन चे असिस्टंट जनरल मॅनेजर नारायण लाड यांनी केले.